“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:24 PM2024-09-24T16:24:11+5:302024-09-24T16:27:09+5:30

Ramdas Athawale Reaction On Akshay Shinde Encounter: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा राजकीय एन्काऊंटर केला आहे, असा पलटवार रामदास आठवले यांनी संजय राऊतांच्या टीकेवर केला.

ramdas athawale reaction over badlapur case police akshay encounter | “विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले

“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले

Ramdas Athawale Reaction On Akshay Shinde Encounter: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका करण्यात येत आहे. यातच या प्रकरणावरून ठाकरे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 

अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही

संजय राऊत म्हणतात की, शिंदेंनी शिंदेचे एन्काउंटर केले. पण एकनाथ शिंदे यांनी कुणाचा एन्काउंटर केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे एन्काउंटर केले. उद्धव ठाकरेंचे राजकीय एन्काउंटर केले. अक्षय शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय होता. माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती. मी मागणी केली होती की, त्याला फाशी व्हायला पाहिजे. त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली. विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची काही गरज नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना एवढी मते मिळाली नाहीत की त्यांना राज्यात मान्यता मिळाली नाही. सगळ्या जागी उमेदवार उभे करतात, पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी इकडे तिकडे न जाता महायुती सोबत यावे आणि विधानसभा लढवावी ही त्यांना ऑफर आहे, असा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी केला.
 

Web Title: ramdas athawale reaction over badlapur case police akshay encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.