कोरड्या दुष्काळाच्या छायेत बंधाऱ्यांचे लोकार्पण
By admin | Published: August 14, 2014 01:16 AM2014-08-14T01:16:12+5:302014-08-14T01:16:12+5:30
कोरड्या दुष्काळाच्या छायेत जलसंधारण व (लघुसिंचन) व कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शासनाने निश्चित केला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त : अनेक ठिकाणचे बंधारे कोरडेच
अमरावती : कोरड्या दुष्काळाच्या छायेत जलसंधारण व (लघुसिंचन) व कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शासनाने निश्चित केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवार १४ आॅगस्ट रोजी हा कार्यक्रम राज्यभर होणार आहे. राज्यातील ३ हजार २२५ बंधाऱ्यांचे लोकार्पण यावेळी केले जाईल.
यामध्ये अमरावती विभागातील ४८१ बंधाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, पावसाअभावी विदर्भासह मराठवाड्यात कोरड्या बंधाऱ्यांचे लोकार्पण करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर आली आहे. राज्यात २०११-१२ पासून हा उपक्रम राबविला जात आहे. २०१२-१३ मध्ये १ हजार ४८७ बंधाऱ्यांचे ९ जून २०१३ रोजी लोकार्पण झाले होते. त्यानंतर जलसंधारण विभागाच्या २७२ लघुसिंचन प्रकल्पांचे १३ जानेवारी २०१४ रोजी लोकार्पण झाले. अमरावतीसह राज्यभरात तिसऱ्यांदा ३ हजार २२५ बंधाऱ्यांचे लोकार्पण होणार आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीत जिल्ह्यात व इतर ठिकाणी बंधाऱ्यांची झालेली कामे शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहेत.
बंधाऱ्यात पाणी थांबल्यामुळे जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. अमरावतीसह राज्यातील २१२ तालुक्यांतील १ हजार ३१६ गावांमध्ये कृषी विभागाने १ हजार ४२४ तर लघुसिंचन विभागाने १ हजार ८०१ बंधारे बांधले आहेत. त्या बंधाऱ्यांचा लोकार्पण संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्या कार्यक्रमाच्या तयारीत शासनाचा लघुसिंचन विभागातील अधिकारी कर्मचारी लागले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा पाऊस झालेला नाही. लोकार्पण सोहळा होत असताना ज्याठिकाणी सर्वाधिक बंधारे बांधण्यात आले तेच बंधारे कोरडे पडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका मराठवाडा व विदर्भालाही बसला आहे. काही ठिकाणी झालेल्या रिमझिम पावसाने काही बंधाऱ्यांमध्ये पाणीच साचलेले नाहीत. बंधारे कोरडे असले तरीही शासनाने त्याचे लोकार्पण करण्याचे फर्मान काढल्याने कोरड्या बंधाऱ्यांचे लोकार्पण करण्याशिवाय अधिकाऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाहीत. (प्रतिनिधी)