परिवर्तनाचा लढा यशस्वी! , सर्वप्रथम ‘अंनिस’ने केली होती मागणी

By admin | Published: April 9, 2016 03:33 AM2016-04-09T03:33:02+5:302016-04-09T03:33:02+5:30

शिंगणापूर देवस्थानमधील समतेच्या लढाईला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर यश आले. मात्र, ही लढाई १८ वर्षांपासून सुरू होती.

Revolution fight successful! First of all, 'Anis' had demanded | परिवर्तनाचा लढा यशस्वी! , सर्वप्रथम ‘अंनिस’ने केली होती मागणी

परिवर्तनाचा लढा यशस्वी! , सर्वप्रथम ‘अंनिस’ने केली होती मागणी

Next

१८ वर्षांचा संघर्ष : सर्वप्रथम ‘अंनिस’ने केली होती मागणी
अहमदनगर : शिंगणापूर देवस्थानमधील समतेच्या लढाईला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर यश आले. मात्र, ही लढाई १८ वर्षांपासून सुरू होती. शिंगणापुरातील चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश हवा, ही मागणी सर्वप्रथम डॉ. नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली होती.
१९९८ साली सोनई येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद यशवंतराव गडाख यांना देण्यात आले होते. अधिवेशनातील एका परिसंवादास डॉ. दाभोलकरही उपस्थित राहणार होते. मात्र अधिवेशनापूर्वीच दाभोलकरांचे ‘चला चोरी करायला शिंगणापूरला’ हे विधान गाजले. खरे तर दाभोलकरांनी हे विधान वेगळ्या संदर्भाने केले होते. गावकऱ्यांची श्रद्धा दुखावण्याचा त्यांचा काहीही इरादा नव्हता. मात्र, गैरसमज निर्माण केले गेले. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद उफाळला. सोनई येथे होणारे अधिवेशनच उधळण्याचा इशारा काही संघटनांनी दिला. पर्यायाने सोनईचे अधिवेशन रद्द करून ते तरवडी (ता. नेवासा) येथे हलवावे लागले. या वर्षापासूनच शिंगणापुरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळायला हवा, ही मागणी अंनिसने सुरू केली.
या मागणीसाठी २००० साली दाभोलकर, व्यंकटराव रणधीर, पन्नालाल सुराणा, निशा भोसले, बाबा अरगडे, शालिनी ओक यांनी नगरला सद्भावना उपोषण केले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी या उपोषणालाही त्या वेळी मोठा विरोध केला. नेते व कार्यकर्त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.


चौथऱ्यावर जाऊन शनीचा कोप बघा, असे आव्हान त्या वेळी दाभोलकर यांना दिले गेले. त्यामुळे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, बाबा आढाव, एन.डी. पाटील, पुष्पा भावे हे शिंगणापूरचा चौथरा चढण्यासाठी निघाले होते. मात्र, या सर्वांना नगरजवळच अटक झाली. दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका झाली. नगर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पी.बी. कडू पाटील व राज्य कार्यवाह बाबा अरगडे हे या लढ्याची सर्व सूत्रे सांभाळत होते. अगरडे यांच्या नेवासा फाटा येथील घरावर या प्रकरणात हल्लाही झालेला आहे. अरगडे यांना त्यानंतर सहा महिने पोलीस संरक्षण होते. त्यांना जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते. दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी अरगडे यांची तडीपारी रद्द करण्यासाठी नगरला मोर्चा काढला होता. याच विषयावर पंढरपूर ते नगर अशी समता दिंडीही काढण्यात आली होती.
दाभोलकरांनी या विषयावर २००१ साली याचिका दाखल केली. ती अद्यापही प्रलंबित आहे. घटनेने स्त्री-पुरुष समता सांगितलेली आहे. त्यामुळे देशभर सर्वत्र हे तत्त्व पाळले जावे. सर्व जाती-धर्मांतील स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच उपासनेचे स्वातंत्र्य आहे, अशी व्यापक मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेच्या निकालाची अजून प्रतीक्षा आहे. दाभोलकर आज हयात नाहीत. मात्र, त्यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे. (प्रतिनिधी)
>दाभोलकर नेमके काय म्हणाले होते?
‘चला चोरी करायला शिंगणापूरला’ ही दाभोलकरांची घोषणा गाजली. पण, दाभोलकरांनी हे विधान वेगळ्या संदर्भाने केले होते. १९९८ साली सोनईत होणाऱ्या सत्यशोधक परिषदेच्या पार्श्वभूमीवर काही पत्रकार पुण्यात दाभोलकरांना भेटले. सोनईच्या जवळच शिंगणापूर हे गाव असून तेथील घरांना दरवाजे नाहीत, तेथे चोरी होत नाही, असे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणले होते. त्यावर दाभोलकर ‘अरे वा, चला मग चोरी करायला’ असे सहजपणे उद्गारले. पण त्यांच्या या विधानाचीच मोठी बातमी झाली व वाद उफाळला. आपण कोणत्याही श्रद्धेच्या विरोधात नाहीत. मात्र, अंधश्रद्धा आपणाला मंजूर नाही, असे त्यानंतर ते वारंवार सांगत राहिले.

‘तिने’ घडविले परिवर्तन
अहमदनगर : चारशे वर्षांची परंपरा खंडित होऊन महिलांनी शनीचा चौथरा चढला त्याचा लढा २८ नोव्हेंबरला चौथऱ्यावर प्रवेश केलेल्या पुण्यातील तरुणीने खऱ्या अर्थाने पेटविला. तिने नकळतपणे चौथऱ्यावर प्रवेश केल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
सुरक्षारक्षकांची नजर चुकवत काही सेकंदात ही तरुणी चौथऱ्यावर गेली होती. त्यानंतर ती तातडीने निघून गेली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते चित्रित झाले. तरुणीच्या स्पर्शाने चौथरा अपवित्र झाल्याचे सांगत देवस्थानने दुधाने अभिषेक केला. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी जाहीरपणे महिलांच्या प्रवेशासाठी लढा सुरू केला. चौथरा प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला तीन वेळा शिंगणापुरात गेल्या होत्या. मात्र, त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मंदिरात स्त्री-पुरुष असा भेद करता येणार नाही, असा निकाल दिला. मात्र, त्यानंतरही शिंगणापूर देवस्थान चौथरा प्रवेश देण्यास तयार नव्हते. आम्ही पुरुषांनाही चौथऱ्यावर बंदी केली आहे, असे देवस्थान सांगत होते. त्यामुळे पुरुष भाविकांच्याही श्रद्धेवर गदा आली. त्यामुळे ग्रामस्थांमुळे देवस्थानचाही नाइलाज झाला. श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ म्हणून पाचारण केले होते. मात्र, त्यांना तोडगा काढता आला नाही. शिंगणापूर देवस्थानच्या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर व अन्य देवस्थानांत काय निर्णय होणार, याची उत्सुकता आहे.


>ऐतिहासिक निर्णयाने अखेर परंपरेची साडेसाती संपुष्टात

अहमदनगर : महिलांना चौथऱ्यावर प्रवेश देण्याचा निर्णय घेऊन शिंगणापूर देवस्थानने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर देवस्थानने भूमिका घेऊन परंपरेची साडेसाती संपुष्टात आणली.
शिंगणापूर विषयाचे मोठ्या प्रमाणावर राजकारणही केले गेले. राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी याविषयी थेट यशवंतराव गडाख यांच्यावर टीका केली होती. मात्र, हा निर्णय घेणे हे गडाख यांच्यासाठीही सहजसोपे नव्हते. नेवासा हा वारकरी संप्रदायाला मानणारा तालुका आहे. विद्यमान भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे हे वारकरी आहेत. ‘जय हरी’ ही त्यांची निवडणुकीतील घोषणाच होती. मात्र, आमदार मुरकुटे यांनीही या प्रश्नी भूमिका घेतली नाही.
माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आध्यात्मिक क्षेत्राला या विषयावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, आध्यात्मिक क्षेत्रातून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. देवस्थान बचाव कृती समितीही प्रथा मोडण्यास विरोध करत होती. एखादा धार्मिक निर्णय घेणे, हे कुठल्याही देवस्थानसमोर आव्हान असते. तेच आव्हान शिंगणापूरच्या ट्रस्टींसमोरही होते. मात्र, देवस्थानने योग्य वेळी त्यावर तोडगा काढत क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. यशवंतराव गडाख यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच ट्रस्टींनी हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, गडाख प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.
या देवस्थानने यापूर्वीही वेळोवेळी भाविकांच्या सोयीसाठी बदल केले आहेत. पूर्वी ओल्या वस्त्रानिशी भक्त चौथऱ्यावर जात होते. यात भाविकांची दलालांकडून मोठी लूट होत होती. त्यामुळे देवस्थानने ओल्या वस्त्रांची प्रथाच बंद करून टाकली.
महिलांना प्रवेश दिला जात नसल्याने पुरुषांनाही चौथऱ्यावरील प्रवेश बंद करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला होता. मात्र, या निर्णयावर टीका झाल्यानंतर आता स्त्री-पुरुष दोघांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेऊन चौथरा सर्वांसाठी
खुला करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
> ‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत : महिलांना चौथऱ्यावर प्रवेश देता येत नाही म्हणून कावडीधारकांना प्रवेश देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय शिंगणापूर देवस्थानने घेतला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ‘कावडीची परंपरा मोडता, मग महिला प्रवेशाची का नाही?’ असा सवाल देवस्थान ट्रस्टला केला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवस्थानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी लक्ष घालून समतेची गुढी उभारावी, असे आवाहन केले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून स्वागत झाले.
> सकाळी जलाभिषेकप्रसंगी रुढी-परंपरा पाळण्यास देवस्थान ट्रस्टने विरोध केला़ त्यामुळे संतापलेल्या भाविक व ग्रामस्थांनी थेट चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केला़ त्यामुळे देवस्थानने घाईने महिलांसाठी चौथरा खुला करण्याचा निर्णय घेतला़ देवस्थानचा निर्णय शिंगणापूर ग्रामस्थ व परिसरातील गावांमधील भाविकांना कितपत पटतो, हे काळ ठरवेल़
- संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, शनैश्वर बचाव कृती समिती
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९८ सालीच हा लढा सुरू केला होता़ शनी चौथरा प्रवेशासाठी नरेंद्र दाभोलकर, डॉ़ श्रीराम लागू यांना २००० साली अटक झाली होती़ २००१ मध्ये डॉ़ दाभोलकरांनी महालक्ष्मी व शिंगणापूर देवस्थानांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ ती प्रलंबित आहे़
- अ‍ॅड़ रंजना गवांदे, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अहमदनगर
विश्वस्तांनी ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला हवे होते़ पण त्यांनी हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला. शनीमूर्तीला कावडीतून आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्याची परंपरा आहे़ ही परंपरा पाळण्यासाठी ग्रामस्थांनी आग्रह धरला म्हणून विश्वस्तांनी ग्रामस्थांच्या पाठीतच खंजीर खुपसला, हे चुकीचे आहे़ - आ. बाळासाहेब मुरकुटे, नेवासा
>आंदोलनाचा घटनाक्रम
२८ नोव्हेंबर : पुण्यातील एका तरुणीने सुरक्षारक्षकांचे कडे भेदून चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेल वाहिले
२९ नोव्हेंबर : तरुणीने थेट शनी चौथऱ्यावर प्रवेश केल्यामुळे ट्रस्टने चौथऱ्याचा दुग्धाभिषेक केला. त्यामुळे राज्यभर देवस्थानच्या भूमिकेविरोधात जनक्षोभ भडकला़
२० डिसेंबर : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, दुर्गा शुक्रे, पुष्पक केवडेकर, प्रियंका जगताप यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट शिंगणापूर गाठले़ शनी चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले.
२१ डिसेंबर : प्रजासत्ताकदिनी शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदर्शन घेणारच, अशी जाहीर घोषणा ‘भूमाता’ने केली़
१२ जानेवारी : हिंदू जनजागृती समितीने ‘भूमाता’विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व त्यांना अटकाव करण्याची मागणी केली़
२१ जानेवारी : भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी शनी चौथऱ्यावर जाऊ नये, असा आदेश पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी काढला़ तसेच देवस्थानशी चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली.
२२ जानेवारी : भूमाता ब्रिगेडच्या महिलांना शिंगणापूरला जाण्यापासून अडविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीही सरसावली़
२६ जानेवारी : ठरल्याप्रमाणे भूमाता ब्रिगेड शिंगणापूरला निघाली. मात्र, त्यांना नगरजवळील सुपा येथे पोलिसांनी अडविले़
२६ जानेवारी : महिलांना शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा, असे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी केले.
६ फेब्रुवारी : जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान, भूमाता, देवस्थान बचाव समिती यांची एकत्रित बैठक घेतली.
७ फेबु्रवारी : शनी चौथऱ्याच्या प्रवेशावरून पेटलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुण्यात भूमाता ब्रिगेड, शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट, शनैश्वर देवस्थान बचाव समिती यांची संयुक्त बैठक घेतली़ तीन फुटांवरुन महिलांना दर्शन दिले जावे, हा तोडगा त्यांनी सुचविला.
१२ फेब्रुवारी : नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यांनीच तोडगा काढण्याची गळ घातली़
२२ फेबु्रवारी : तृप्ती देसाई, माधुरी शिंदे, मीना भटकर, मनीषा टिळेकर, शहनाज शेख, आशाताई गाडीवडार, मंगल पाटे यांनी पुन्हा शिंगणापुरात जाण्याचा प्रयत्न केला.
१९ मार्च : सायंकाळी चार वाजता तृप्ती देसाई काही महिलांसोबत अचानक शनिशिंगणापुरात अवतरल्या़ पोलिसांनी त्यांना चौथऱ्याकडे जाण्यापासून रोखले.
३० मार्च : अ‍ॅड़ नीलिमा वर्तक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ़ विद्या बाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन पुरुषांना प्रवेश असलेल्या मंदिरांत महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
२ एप्रिल : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तृप्ती देसाई शिंगणापुरात आल्या़ मात्र, ग्रामस्थ व पोलिसांनी त्यांना चौथऱ्यावर जाऊ दिले नाही़
८ एप्रिल : कावडीधारकांचा चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक. त्यानंतर महिलांनाही प्रवेश देण्याची देवस्थानची घोषणा.

Web Title: Revolution fight successful! First of all, 'Anis' had demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.