रस्ते बांधकामात प्लास्टिक
By Admin | Published: June 27, 2014 12:32 AM2014-06-27T00:32:06+5:302014-06-27T00:32:06+5:30
पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्या आता रस्ते बांधकामात वापरल्या जात आहेत. तामिळनाडू सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून असे
वसुंधरेचे संरक्षण : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा पुढाकार
संतोष अरसोड -यवतमाळ
पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्या आता रस्ते बांधकामात वापरल्या जात आहेत.
तामिळनाडू सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून असे रस्ते बांधण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर वाशिम जिल्ह्यात १२ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण झाला आहे.
भारतात पॉलिइथीलीन, पॉलिप्रापेलिन व पॉलिस्टिरीन प्रकारचे पॉलिमर्स वापरल्या जातात. यातील ५० टक्के प्लास्टिक अत्यंत पातळ असल्यामुळे त्याची वेचणी व रिसायकलिंग होत नाही. परिणामी पर्यावरणासमोर प्लास्टिकचे मोठे आव्हान उभे झाले आहे. आता मात्र प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते बांधकाम तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
पातळ प्लास्टिकचा वापर डांबरी रस्त्यात करून रस्त्याचे जीवनमान वाढविण्यासोबत पर्यावरणाचे रक्षणही करण्यात येत आहे. या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ते बांधकामात होत आहे. पातळ प्लास्टिकला १२० ते १५० डिग्री उष्णतेवर गरम करुन रस्ता बांधकामातील खडीसोबत मिसळून डांबरीकरणात वापरण्यात येत आहे.
या खडीमुळे क्षार जमा होण्याची प्रक्रिया मंदावते व खडी खराब होत नाही. यासाठी प्लास्टिक कचऱ्याचे साधारण ४ एमएम आकारापर्यंत तुकडे केले जातात. त्याला विशिष्ट तापमानापर्यंत तापविण्यात येते. हे तुकडे गरम खडीसोबत सोडल्यानंतर अर्ध्या मिनिटात वितळून खडीभोवती पाणी निरोधक आवरण तयार करतात. त्यानंतर त्यात पारंपारिक पद्धतीने डांबर मिसळून रस्ता बांधकामात उपयोग केला जातो.
या प्रक्रियेमुळे पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक नष्ट होण्यास मदत होत असून डांबराची देखील बचत होत आहे. तसेच वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडॉय आॅक्साईडचीही बचत होत आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून एक किलोमीटर रस्ता बांधल्यास एक मेट्रिक टन प्लास्टिकचा लागते तर एक मेट्रिक टन डांबराची बचत होते.