समीर गायकवाडच मारेकरी!

By admin | Published: October 8, 2015 01:17 AM2015-10-08T01:17:43+5:302015-10-08T01:19:03+5:30

ओळख परेड : चौदा वर्षांच्या मुलाने बारा संशयितांमधून समीरला ओळखले गोविंद पानसरे हत्या प्रकरण

Sameer Gaikwad killer! | समीर गायकवाडच मारेकरी!

समीर गायकवाडच मारेकरी!

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड याच्याकडे बोट करून ‘हाच तो मारेकरी’ असल्याचे प्रत्यक्षदर्शी १४ वर्षांच्या शाळकरी मुलाने पोलिसांना सांगितले. संशयित आरोपीची ओळख परेड तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर बुधवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात सकाळी अकरा वाजता झाली. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर समीरसह बारा संशयितांना उभे केले होते. यावेळी उमा पानसरे, मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने येथे तो माणूस उपस्थित नाही, असे सांगितले; चौदा वर्षांच्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवीत समीरवर ती रोखली आणि त्याच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीची घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदारांच्यासमोर ओळख परेड घेण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्याकडे केला होता. त्यास न्यायमूर्ती डांगे यांनी परवानगी देत करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर ओळख परेड घेण्यात यावी, असे आदेश पोलिसांना देऊन ओळख परेडसाठी हजर राहण्यासाठी खरमाटे यांनाही पत्र पाठविले होते. समीरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. ९) संपत आहे. या दिवशी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी त्याच्या वाढीव न्यायालयीन कोठडीसह ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय होणार आहे.


‘लोकमत’मध्ये सर्वप्रथम वृत्त
हल्लेखोर कोण असावेत, याचा अंदाज बांधत असताना त्यांना कोणी पाहिले का? हे पाहणे पोलिसांसाठी महत्त्वाचे होते. त्यासाठी पोलिसांनी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे चौकशी केली; परंतु हल्लेखोरांना पाहिल्याचे कोणीच सांगत नव्हते. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी परिसरातील लहान मुलांकडे चौकशी केली असता चौदा वर्षांच्या मुलाने आपण हल्लेखोरांना पाहिल्याचे सांगितले होते. देशमुख यांनी त्याला विश्वासात घेऊन घटनास्थळी आणले. त्याच्याकडून हल्लेखोरांनी हल्ला कसा केला, याची माहिती घेतली. तेथून देशमुख ‘त्या’ मुलाला पुन्हा आजूबाजूला घेऊन गेले. त्यानंतर त्याला पोलीस जीपमध्ये बसवून सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्याचा लेखी जबाब घेतला. त्यानंतर त्या मुलाला त्याच्या वडिलांसोबत घरी पाठविले. हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘त्या’ मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचे रेखाचित्र बनविले होते.


अशी झाली ओळख परेड
1 ओळख परेड घेण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख हे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघाजणांना घेऊन कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेले.
2 त्यांच्यासोबत मेघा पानसरे, कॉ. दिलीप पवार, कॉ. रघुनाथ कांबळे हे देखील होते. पाठोपाठ करवीरचे तहसीलदार डॉ. खरमाटे कारागृहात आले. काहीवेळ कारागृहाबाहेर थांबवून कारागृह प्रशासनाच्या परवानगीनंतर सर्वांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला.
३यावेळी चौघा साक्षीदारांच्या समोर एका रांगेत वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या बारा संशयितांना उभे केले होते.


4पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी साक्षीदार उमा पानसरे यांना तुम्ही पाहिलेला मारेकरी यापैकी कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावर सर्वांकडे नरज टाकून त्यांनी ‘तो माणूस इथे नाही’ असे सांगितले. त्यानंतर मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीलाही विचारले. दोघांनीही येथे मारेकरी उपस्थित नसल्याचे सांगितले.
5त्यानंतर शाळकरी मुलाला विचारले. त्याने बारा संशयितांच्या चेहऱ्याकडे नजर फिरवीत समीरवर रोखली. काही क्षणातच त्याने हाताने समीरकडे बोट दाखवीत ‘हाच तो मारेकरी’, मी पाहीलं होतं त्याला, असे सांगितले. त्यानंतर सर्व संशयितांना कारागृहातील बॅरेकमध्ये पाठविले.
6 उमा पानसरे यांच्यासह साक्षीदारांना बंदोबस्तात पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यात आले. या संपूर्ण ओळख परेडचा अहवाल तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयाकडे सादर केला.

रुद्र-समीरचे कनेक्शन का तपासले नाही..?
हायकोर्टाची विचारणा : तपास अहवाल सादर करा
कोल्हापूर / मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘संशयित’ म्हणून अटक केलेल्या समीर गायकवाड याचे रुद्र पाटील याच्याशी काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलिसांनी अजून का केला नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी केली. हा तपास करून त्याचा अहवाल
२८ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
तत्पूर्वी पानसरे हत्येच्या तपासाचा सद्य:स्थिती अहवाल ‘एसआयटी’च्या तपास पथकाने व दाभोलकर हत्येचा सीबीआयच्या पथकाने न्यायालयासमोर सादर केला. या सुनावणीस डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते. पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लवकर लागावा यासाठी करण्यात आलेल्या याचिकेची एकत्रित सुनावणी बुधवारी न्यायमूर्ती (पान १वरून)
रणजित मोरे व आर. जे. केतकर यांच्या खंडपीठापुढे झाली. दोन्ही याचिकांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी २८ आॅक्टोबरला होणार आहे.
गायकवाड याला कोल्हापूर न्यायालयात सादर केल्यानंतर त्याच्या वकिलांनी बाजू मांडताना समीर व रूद्र पाटील यांच्यात मैत्रीचे संबंध होते म्हणून तेवढ्यावर तुम्ही कोठडीची मुदत वाढवून मागू शकत नाही, असे स्पष्टीकरण केले होते. याचा अर्थ समीरच्या वकिलांनीही त्याचे रूद्र पाटील याच्याशी संबंध आहेत हे मान्य केले आहे; परंतु पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात रूद्र पाटील याला पकडण्यासाठी पोलिसांनी किंवा सीबीआयने काय प्रयत्न केले, याचा कोणताच उल्लेख नसल्याचे नेवगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
‘सीबीआय’च्या वेबसाईटवर रूद्र पाटील याचा पत्ता व फोटो आहे परंतु बाकीची काहीच माहिती त्यामध्ये नाही. याउलट ‘एफबीआय’च्या वेबसाईटवर मात्र संशयित आरोपीच्या फोटोसह त्याची सविस्तर माहिती कशी दिलेली असते, याचीही माहिती नेवगी यांनी न्यायालयासमोर सादर केली.
रूद्र पाटील हा मडगाव बॉम्बस्फोटातील संशयित आहे व त्याच्याशी संबंधित असलेल्या महिलेनेच समीर गायकवाड याचे वकीलपत्र घेतले असल्याचेही नेवगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व या दोन्ही हत्या प्रकरणातील रूद्र पाटील व गायकवाड यांचे कनेक्शन काय आहे, हे तपासण्याची विनंती केली.
हा मुद्दा न्यायालयानेही उचलून धरत तसा आदेश दिला. सीबीआयच्यावतीने गोन्सालविस यांनी तर राज्य सरकारच्यावतीने श्रीमती मानकुंवर देशमुख यांनी बाजू मांडली.
एकीकडे समीर गायकवाडला वाचवण्यासाठी सनातनने वकिलांची फौज उभी केली असताना, दुसरीकडे सरकारने त्याच्याविरुद्ध केस लढण्यासाठी अद्याप एकाही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही.
समीरची पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी पोलिसांनाच कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांसमोर युक्तिवाद करावा लागला, अशी माहिती याचिकाकर्त्या स्नेहा पानसरे यांचे वकील अभय नेवगी यांनी न्या. रणजित मोरे व न्या राजेश केतकर यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर हे अत्यंत खेदजनक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले.

जबाबदारीचे काय..
दाभोलकर प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीत हयगय केली असेल तर त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणारी कोणतीच यंत्रणा सध्या राज्य सरकारकडे नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचीही न्यायालयाने दखल घेत पुढील सुनावणीपर्यंत त्यासंबंधीच्या सूचना कराव्यात म्हणजे राज्य सरकारला आदेश करण्यास सोयीचे होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केल


विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती का नाही ?
कोल्हापुरात समीरला न्यायालयात हजर केले तेव्हा त्यासाठी शासनाने सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमलेला नव्हता. त्यामुळे सरकारची बाजू कमकुवत पडली. पोलिसांच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी बाजू मांडल्याने समीर गायकवाडला कोठडी मिळाल्याचे मत नेवगी यांनी न्यायालयात मांडले. यावर न्यायालयाने जिल्हा सरकारी वकिलांनी (डीजीपी) बाजू का मांडली नाही, अशी विचारणा केली.

Web Title: Sameer Gaikwad killer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.