पेंचचा वाघ पुण्याला रवाना होणार !
By admin | Published: August 24, 2014 01:16 AM2014-08-24T01:16:01+5:302014-08-24T01:16:01+5:30
अखेर पेंचमधील वाघ पुणे शेजारच्या कात्रज येथे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पुणे येथील वन विभागाचे एक पथक गाडी व पिंजऱ्यासह गत शुक्रवारीपासून नागपुरात दाखल झाले आहे.
पुण्याचे पथक दाखल : वन्यजीव प्रेमींचा विरोध
नागपूर : अखेर पेंचमधील वाघ पुणे शेजारच्या कात्रज येथे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पुणे येथील वन विभागाचे एक पथक गाडी व पिंजऱ्यासह गत शुक्रवारीपासून नागपुरात दाखल झाले आहे. दुसरीकडे पेंच कार्यालयातील वन अधिकारी व कर्मचारी गत दोन दिवसांपासून एन्क्लोजरमधील त्या वाघाला पिंजऱ्यात कैद करण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु माहिती सूत्रानुसार शनिवारी रात्री उशिरापर्यंत तो पिंजऱ्यात पोहोचलेला नव्हता. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, तो वाघ पिंजऱ्यात पोहोचताच, पुणे येथील पथक त्याला घेऊ न लगेच पुण्याकडे रवाना होणार आहे.
विदर्भातील ‘वाघ’ हा उपराजधानीची ओळख बनला आहे. त्यामुळेच नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ चा दर्जा मिळावा, अशी मागणी रेटली जात आहे. परंतु अशा स्थितीत नागपूर वन विभागाने विदर्भातील वाघ पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट घातला आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, पेंच व्याघ्र प्रकल्पातील या वाघाला पुणे शेजारच्या कात्रज येथील राजीव गांधी ज्युलॉजिकल पार्कमध्ये पाठविण्यात येत आहे. मात्र वन विभागाच्या या निर्णयाचा विदर्भातील वन्यजीव प्रेमी संघटना व काही स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध करीत आहे. विदर्भातील वाघ येथेच राहावा, म्हणून त्याला महाराज बागेतील प्राणिसंग्रहालयात ठेवण्याची मागणी केली जात आहे. परंतु वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडेल भूमिकेमुळे विदर्भातील एक वाघ कमी होण्याची वेळ आली आहे.
असा घडला घटनाक्रम..
सध्या हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पातील एन्क्लोजरमध्ये राहत आहे. शिवाय त्याच्यासोबत पुन्हा दोन वाघिणीही आहेत. वन विभागाने सुरुवातीला या तिन्ही वाघांना जंगलात सोडण्याची योजना तयार केली होती. त्यासाठी गत जानेवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वन्यजीव तज्ज्ञांची एक चमू पेंच येथे आली होती. त्या चमूने तिन्ही वाघांचे निरीक्षण करून, येथील केवळ दोन वाघिणीच जंगलात सोडण्याच्या स्थितीत असून, वाघ हा जंगलात सोडण्यासाठी ‘अनफिट’ असल्याचे सांगितले होते. त्यावर वन विभागाने त्याला महाराज बागेत ठेवण्याची तयारी दर्शविली होती.
परंतु महाराज बाग प्रशासनाने त्या वाघाच्या बदल्यात येथील अन्य एक वाघिण वन विभागाने स्वीकारावी, अशी अट घातली होती. वन विभागाने ती अट फेटाळून, वाघाला कात्रज घेणे पाठविण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे महाराज बाग प्रशासनाला वन विभागाचा हा निर्णय कळताच, त्यांनी माघार घेत, वाघाला महाराज बागेत ठेवण्याची तयारी दर्शवून त्यासंबंधी वन विभागाला पत्र दिले. परंतु आता वन विभागाने वाघ हा कात्रच येथेच जाणार, अशी ताठर भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)