जलयुक्तचा दुसरा टप्पा धीम्या गतीने
By admin | Published: May 19, 2016 06:08 AM2016-05-19T06:08:15+5:302016-05-19T06:08:15+5:30
जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील ४७० कामे प्रगतीपथावर आहेत.
राजेश खराडे,
बीड- जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील ४७० कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ््यापूर्वी त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र बीडमध्ये १७ व आष्टी तालुक्यात २० कामे वगळता इतर तालुक्यांमध्ये अजून कामांचा श्रीगणेशाही झालेला नाही.
सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरीता मराठवाड्यात सर्वाधिक २४२ गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. याविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामांचा आढावा घेऊन कामे त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बीड तालुका कृषी विभागाच्या वतीने १७ कामांच्या निविदा काढून कार्यरंभाचे आदेश देण्यात आले आहेत.
वस्तुत: मार्च अखेरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही प्रक्रियेतच कामे अडकली आहेत.
गावांची नावे जाहीर होताच त्याची पाहणी करून आवश्यक असणाऱ्या कामांच्या याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असतानाही कामांना गती मिळालेली नाही.
निविदा प्रक्रियामुळे खोडा
पहिल्या टप्प्यातील कामे कृषी विभागाअंतर्गत होती. त्यामुळे कामांत अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. दुसरा टप्पा हा निविदेनुसार होत असल्याने हा सहभाग कमी झाला आहे. अनेक तालुक्यांमधून कामांच्या याद्याही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे जमा नाहीत. त्यामुळे नेमकी काय कामे सुरू आहेत याबाबत वरिष्ठ अधिकारीही दुसऱ्या टप्प्याबाबत अनभिज्ञ आहेत.
दुष्काळामुळे शेततळ्यांच्या कामांना ब्रेक
जालना : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७०६ शेततळ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, तीव्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी या कामांना ब्रेक दिल्याचे चित्र आहे. तळ््यासाठी शासनाकडून ५० हजार रुपयांचे किरकोळ अनुदान मिळत आहे. यातून शेततळे तयार करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या योजनेअंतर्गत साडेपाच हजार अर्ज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. दुष्काळ व तसेच शेतकऱ्यांकडे पैशांची जुळवाजुळव नसल्याने मंजूर असलेले शेततळ्यांची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस पडल्यावरच शेतकरी शेततळी करतील, असा अंदाज कृषी अधिकारी व्यक्त करतात.