संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:50 IST2025-01-06T12:49:52+5:302025-01-06T12:50:21+5:30
Sharad Pawar Letter To CM Devendra Fadnavis About Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे, असे सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी
Sharad Pawar Letter To CM Devendra Fadnavis About Beed Santosh Deshmukh Case: बीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात झालेल्या जन आक्रोश मोर्चा, आंदोलनानंतर विरोधकांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले. तर, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केवळ महाविकास आघाडी नाही, तर महायुतीतील नेतेही आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मोठी मागणी केल्याचे सांगितले जात आहे.
बीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख संशयित वाल्मीक कराड शरण आल्यानंतर या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आल्यानंतर भिवंडी, गुजरातमध्ये ते कसे गेले आणि कुठे थांबले होते, याबाबत विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. एकीकडे विरोधक या प्रकरणी आक्रमक झाले असतानाच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. याबाबत शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे.
बीड प्रकरणी शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुडांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा, याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमूळे खणून काढावीत, अशी देखील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणास विनंती की, सदर घटनेविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जिवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी, तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे, असे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, असे शरद पवारांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी… pic.twitter.com/utwEDgoKMQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2025