"बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:39 PM2024-08-23T13:39:11+5:302024-08-23T13:41:59+5:30

बदलापूर अत्याचाराच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Sharad Pawar has criticized CM Eknath Shinde over Badlapur School Crime case | "बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..."

"बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..."

Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित  शाळेत दोन चिमुरड्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी आरोपी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केले होते. हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. आता या घटनेवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. या आंदोलनातून केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्याचे शरद पवार यांनी म्हटलं.

बदलापूरची घटना आणि राज्यातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी या बंदमधून लोकांनी महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त कराव्यात असं म्हटलं आहे.

"काल जे काही म्हणाले ते बदलापूरपर्यंत सीमित नव्हतं. त्याआधी तीन चार दिवसापूर्वीही काही ना काही घटना घडल्याचे दिसले. बालिकांवील, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच्याबद्दल लोकांमध्ये असलेला उद्रेक आणि राग हा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे. हा बंद अत्यंत शांततेणे पाळण्यात यावा. माझ्या पक्षासह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभागी व्हावं. याच्या माध्यमातून ज्या घटना महाराष्ट्रात होत आहेत त्याच्या संबंधी तीव्र भावना व्यक्त करणे हा त्याचा हेतू आहे," असं शरद पवार म्हणाले.

"आम्ही तिथे काय गेलो नव्हतो. पण माझ्या मते त्यावेळी कोण कुठल्या राजकीय पक्षाचे नव्हतं. असा प्रकार झाल्यानंतर त्याच्यावर ते राजकीय होतं अशी टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री असं बोलले नसतं तर योग्य झालं असतं. हा प्रश्न लोकांच्या संवेदना व्यक्त करण्याचा आहे. इथं कुणीही राजकारण आणलं नाही. आमच्या लोकांच्या मनातही नव्हत की अशाप्रकारे राजकीय काही करावं. केवळ बालिकेच्या अत्याचारावरील तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. याच्याकडे त्या दृष्टीकोनातून बघू नये," असंही शरद पवार म्हणाले.  

"या घटना थांबताना नाही तर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटी समाजाला जागृत करावं लागेल. तसेच कायद्याच्या यंत्रणेलाही जागं करावं लागेल. मी कोणाला दोष देत नाही. पण हे न घडण्यासाठी जे जे करावं लागेल ते चौकटीत राहून करण्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. या प्रकरणात गृहखात्याने संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची प्रतिक्रिया आली. लोकांनी शांतपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. असं असतानाही त्यांना अटक करणे या गोष्टी योग्य नाहीत.  राज्य सरकारने याबाबत अधिक संवेदनशील व्हावं अशी अपेक्षा आहे," असं शरद पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

"बदलापूरचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती," असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

Web Title: Sharad Pawar has criticized CM Eknath Shinde over Badlapur School Crime case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.