सुधींद्र कुलकर्णींवरील शाईफेक ही सौम्य प्रतिक्रिया - शिवसेना
By admin | Published: October 12, 2015 11:33 AM2015-10-12T11:33:13+5:302015-10-12T12:47:11+5:30
सुधींद्र कुलकर्णींवरील शाई हल्ला ही सौम्य प्रतिक्रिया असून ही शाई नसून भारतीय जवानांचे रक्त आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - सुधींद्र कुलकर्णींवरील शाई हल्ला ही सौम्य प्रतिक्रिया असून ही शाई नसून भारतीय जवानांचे रक्त आहे असे सांगत सेना नेते संजय राऊत यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप कुलकर्णींनी केला होता. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, सुधींद्र कुलकर्णींना डांबर फासलं की शाई फेकली हे मला माहित नाही. शिवसेनेसोबत सर्वसामान्यांमध्येही पाकिस्तानविरोधात संताप आहे. आमच्या जवानांचे व निरपराध नागरिकांचे रक्त बघून तुमचे रक्त खवळत नाही, पण शाई बघून तुम्ही चिडता असा टोलाही त्यांनी कुलकर्णी यांना लगावला. हे सर्व जण पाकचे चमचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये अस्थितरता निर्माण करुन जवानांची हत्या घडवून आणेल तोपर्यंत आमचा पाकविरोध कायम राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.