"राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवतोय ते सर्व फुसकेच ठरतायत" 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:07 AM2022-03-05T08:07:23+5:302022-03-05T08:08:01+5:30

शिवसेनेचा राज्यपाल कोश्यारी आणि भाजपवर निशाणा. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत असल्याची शिवसेनेची टीका.

shiv sena saamna editorial slams on bjp devendra fadnavis governor bhagat singh koshyari maharashtra assembly budget session 2022 | "राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवतोय ते सर्व फुसकेच ठरतायत" 

"राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवतोय ते सर्व फुसकेच ठरतायत" 

googlenewsNext

राज्याचे घटनात्मक प्रमुखच जेव्हा घटनेची पायमल्ली करतात तेव्हा काय करायचे, हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तेच केले आहे, असे म्हणत शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले. त्यांनी ‘जय हिंद’ही म्हटले नाही व ‘जय महाराष्ट्र’ही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत, असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून राज्यपाल आणि भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. 

काय म्हटलेय अग्रलेखात?
अनेक राज्यांच्या विधानसभा अधिवेशनात याआधी राज्यपालांचे भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही, पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाटय़ घडविण्यात आले त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाटय़ाचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले. 

'सर्व बार फुसकेच ठरतायत'
अलीकडे लोक खाल्ल्या मिठास जागताना तर दिसत नाहीत, पण राज्यपाल महोदय जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. अर्थात त्यामुळे दूध नासणार नाही. त्या दुधाचे दही किंवा लोणी होईल. विरोधी पक्षाने त्यांची घुसळण कायम ठेवली पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःचे पुरते वस्त्रहरण करून घेतले आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत आहेत. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहेत ते सर्व फुसकेच ठरत आहेत. 

'कारस्थान कोणाच्या भरवशावर?'
राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० चे बहुमत कायम आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे? महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधाने केली. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी केलेले विधान समस्त स्त्रीवर्गाची मान खाली जावी असेच आहे. राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरूचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. याची लाज भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते.

'वाटल्यास महाराष्ट्रातील भाजप मंडळाचे पथक...'
दाऊद हा राष्ट्रद्रोही आहेच व त्याला पाकिस्तानातून इकडे फरफटत आणायला पंतप्रधान मोदी यांना कोणीच थांबवलेले नाही. वाटल्यास महाराष्ट्रातील भाजप मंडळाचे पथक मोदी यांनी कराचीत पाठवून दाऊदच्या मुसक्या बांधून आणावे, पण दाऊदच्या नावावर राजकीय भाकरीचे तुकडे तोडणे थांबवा एवढेच आमचे सांगणे आहे. दाऊदच्या विरुद्ध नारेबाजी करून काय फायदा? हिंमत असेल तर दिल्लीतील सरकारने पाकिस्तानात घुसून त्याला खतम करण्याचे शौर्य दाखवावे, पण भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे व त्यासाठी त्यांनी विधिमंडळात घटनेचा बळी दिला. मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्यास साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव! 

Web Title: shiv sena saamna editorial slams on bjp devendra fadnavis governor bhagat singh koshyari maharashtra assembly budget session 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.