Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय, शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 09:26 AM2022-06-22T09:26:29+5:302022-06-22T09:32:14+5:30

Shiv Sena Saamana On Eknath Shinde and BJP : गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच!, असा इशारा शिवेसेनेने भाजपला दिला आहे.

shiv sena sanjay raut cm uddhav thackeray saamana on eknath shinde and bjp political crisis in maharashtra | Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय, शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल 

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय, शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल 

Next

मुंबई : हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिंदे भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय, असा आरोपही करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून 'ऑपरेशन कमळ' घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत आहे. काल विधान परिषदेत भाजपास दहावी जागा जिंकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांनीच राज्यसभेत भाजपचा धनदांडगा उमेदवार विजयी केला व संजय पवार या शिवसैनिकाचा पराभव घडवून आणला. सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना 'उचलून' गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून 'ऑपरेशन कमळ'वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे? असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी एका तळमळीने भाष्य केले. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत, असे आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश व राजस्थानात ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करून सरकारे पाडली तोच 'पॅटर्न' महाराष्ट्रात वापरायचा व स्वतःला 'किंग मेकर' म्हणून ओवाळून घ्यायचे असे तीन अंकी नाटक सुरू झाले आहे. 'विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मतदान व मतांची फाटाफूट ही तर सुरुवात आहे. आता आम्ही मुंबई जिंकू. मुंबईवर ताबा मिळवू,' अशी भाषा मंगलप्रभात लोढा यांनी केली, यातच सगळे आले. मुंबईवर ताबा मिळवायचा असेल तर शिवसेना डळमळीत करा, हेच महाराष्ट्रद्रोह्यांचे धोरण आहे. स्वतःला 'मावळे' म्हणवून घेणारे त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या कपट-कारस्थानाचे भागीदार होणार असतील तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत. महाराष्ट्र हे शहाण्यांचे राज्य आहे. शहाणपणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या बाबतीत दोन पावले पुढेच असेल. इतर प्रांतात व कळपांत दीडशहाणे असतील तर महाराष्ट्रात साडेतीन शहाणे असतात. दुसरे असे की, महाराष्ट्रास वेगात व वेडात दौडणाऱ्या 'सात' वीरांचा इतिहास आहे, असेही म्हटले आहे.

याचबरोबर, माणसे फोडायची, फितुरीची बिजे रोवायची, त्या फितुरीचे पिक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत, पण देशातील बेरोजगार 'अग्निवीर' रस्त्यावर उतरला आहे, कश्मीरात हिंदूंचे हत्याकांड सुरू आहे. लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही योजना व धमक त्यांच्यात दिसत नाही. फितूर निर्माण करायचे व त्या जोरावरच राज्य आणायचे. हीच यांची 'किंग मेकर्स' कंपनी. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हेच केले. ही ईस्ट इंडिया कंपनीही शेवटी गाशा गुंडाळून निघून गेली. विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला. बरे झाले, या निमित्ताने महाराष्ट्र जागा झाला, असे लेखात म्हटलं आहे. 

महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच!, असा इशारा शिवेसेनेने भाजपला दिला आहे.

Web Title: shiv sena sanjay raut cm uddhav thackeray saamana on eknath shinde and bjp political crisis in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.