केंद्रातून शिवसेनेची माघार, राज्यातही विरोधी बाकावर बसणार ?
By Admin | Published: November 9, 2014 01:32 PM2014-11-09T13:32:48+5:302014-11-09T18:32:21+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास दांडी मारुन भाजपाला शिवसेनेचा 'स्वाभिमान' दाखवला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेने दांडी मारत भाजपाच्या तोडग्यावर असमाधानी असल्याचे दाखवून दिले. शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई दिल्लीत पोहोचले खरे मात्र मातोश्रीवरुन आदेश आल्याने देसाई विमानतळाबाहेर न पडताच तिथूनच मुंबईत परतले.
शिवसेना आणि भाजपामधील तणाव उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवर झालेल्या चर्चेमुळे निवळल्याचे दिसत होते. शिवसेनेनेही राज्यसभेतील खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिमंडळासाठी शिफारस केली होती. यानुसार देसाई रविवारी सकाळी दिल्लीकडे रवानाही झाले होते. मात्र भाजपाने देसाई यांना राज्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनिल देसाई दिल्लीत दाखल झाले होते, मात्र अर्धा तासाचा कालावधी लोटला तरी विमानतळावरुन बाहेर पडत नव्हते. त्यामुळे सेना - भाजपा युतीविषयी संभ्रम निर्माण झाला. अखेरीस मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना फोन करुन माघारी परतण्याचे आदेश दिले. यानंतर दिल्लीत दाखल झालेले शिवसेनेचे अन्य खासदारही विमानतळावर पोहोचले व शिवसेना शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्राविषयी तोडगा निघत नसल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी घेण्यात काहीही उपयोग नाही, आम्ही शपथविधीत जाणार नाही अशी प्रतिक्रिया खा. आनंदराव अडसळू यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.
आज संध्याकाळी मुंबईत शिवसेना आमदारांची निवड केली जाणार आहे.यामध्ये शिवसेनेचा विधीमंडळातील गटनेत्याची निवड होणार आहे. या बैठकीतही शिवसेना राज्यात विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली.