Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray: “तिथे तुम्ही गप्प का?; नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बवर शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 04:22 PM2021-08-14T16:22:00+5:302021-08-14T16:26:40+5:30

Shivsena Arvind Sawant Reaction on Nitin Gadkari Letter: गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Shivsena Arvind Sawant Reply on Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray | Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray: “तिथे तुम्ही गप्प का?; नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बवर शिवसेनेचा टोला

Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray: “तिथे तुम्ही गप्प का?; नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बवर शिवसेनेचा टोला

googlenewsNext

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात खळबळ माजली. शिवसेनेचे स्थानिक नेते कंत्राटदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रोखा अन्यथा महामार्गाच्या कामावर गंभीरपणे विचार करावा लागेल असा इशारा गडकरींना मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिला होता. त्यावरून शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सांवत म्हणाले की, गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत ते खरेच शिवसैनिक आहेत की उगाच आमच्यावर नावानं कुणी बोंबाबोंब करतंय ते बाहेर येईल. परंतु शिवसेनेचा उल्लेख का करता? मुंबई गोवा रोड आम्ही करत नाही पण तिथे काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे ही माणसं तुमच्यासोबत आहेत तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल त्यांनी नितीन गडकरींना विचारला आहे.

EXCLUSIVE नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील!

तसेच नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. बाळासाहेब नेहमी गडकरींचा उल्लेख रोडकरी असं करत. अलीकडे मुख्यमंत्र्यांनीही गडकरींच्या कामाचं कौतुक केले. ते डायनॅमिक व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्राची ताबडतोब दखल घेतली आहे. या घटनेची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत. नितीन गडकरींबद्दल पूर्ण आदर आहे परंतु त्यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळला असता तर बरं झालं असतं. शिवसेना कधी विकासकामांना विरोध करत नाही असंही अरविंद सावंत म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल. हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल.ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.  

गडकरी  पत्रात काय म्हटले?

१.अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

२.या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

Web Title: Shivsena Arvind Sawant Reply on Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.