‘गोली मार भेजे में...’ सांस्कृतिक डोंबिवलीची काळी बाजू

By admin | Published: June 5, 2017 03:38 AM2017-06-05T03:38:43+5:302017-06-05T03:38:43+5:30

डोंबिवलीतील एकेकाळचा नवनाथ गँगविरुद्ध केएमसी गँग हा संघर्ष सगळ्यांना परिचित आहे

'In the shoot' ... ... the cultural side of Dombivli | ‘गोली मार भेजे में...’ सांस्कृतिक डोंबिवलीची काळी बाजू

‘गोली मार भेजे में...’ सांस्कृतिक डोंबिवलीची काळी बाजू

Next

मुरलीधर भवार
डोंबिवलीतील एकेकाळचा नवनाथ गँगविरुद्ध केएमसी गँग हा संघर्ष सगळ्यांना परिचित आहे. संघटित गुन्हेगारी व गँगवारमुळे डोंबिवली रक्तरंजित होती. डोंबिवलीतील या गँग हळूहळू पोलिसांनी मोडीत काढल्या. त्याला काही वर्षे जावी लागली. दोन्ही गँग थंड झाल्या. त्यांची पुढील पिढी आता उच्चशिक्षित झाली. त्यांनी चांगल्या व्यवसायात जम बसवला आहे. त्यांना आता खूनखराबा नको आहे. या सकारात्मक विचारांमुळे डोंबिवलीचा चेहरा बदलत गेला. सांस्कृतिक नगरी अशी तिची ओळख आहे. याच शहरात २०१० मध्ये शाळकरी मुलांचे अपहरण करून खंडणीसाठी दोन मुलांना ठार मारल्याच्या घटना चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या गुन्ह्यांमुळे डोंबिवली हादरली होती. हे प्रकरणही त्यानंतर शांत झाले. २०१३ मध्ये दिल्लीतील तरुणीवर बलात्कार प्रकरण घडले. त्यानंतर, डोंबिवलीतही महिलांचे विनयभंग आणि बलात्काराच्या घटना घडल्या. त्यामुळेही डोंबिवली चर्चेत आली.
डोंबिवलीत पूर्वी आगरी समाजाची वस्ती होती. ते येथील भूमिपुत्र असल्याने त्यांच्याजवळ वडिलोपार्जित जमिनी आहेत. त्या विकून त्यांच्याकडे बक्कळ पैसा आला आहे. त्यातून त्यांनी आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. तसेच उंची आलिशान बंगले बांधले आहे. ते वारंवार त्यांच्याकडील श्रीमंतीचे प्रदर्शन करतात. याच ओघात त्यांच्या हातून गुन्हा घडतो. श्रीमंतीचे प्रदर्शन रोखण्यासाठी डोंबिवलीत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव घेतला होता. मात्र, हा ठराव करणारे साहित्यिक कोण, असा सवाल आगरी समाजातून उपस्थित करण्यात आला होता. आगरी युथ फोरमनेच साहित्य संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेतल्याने त्याची फारशी पुन्हा चर्चा झाली नाही. मात्र, संमेलनात घेतलेला ठराव हा केवळ डोंबिवली शहरापुरता मर्यादित नाही. तो सर्वव्यापी समस्त मराठीजनांसाठी असला, तरी तो डोंबिवलीसाठी किती समर्पक होता, याची प्रचीती गोळीबाराच्या घटना घडल्यावर आली.
रेती, बांधकाम तसेच बांधकाम साहित्य पुरवण्याच्या व्यवसायात हा समाज अधिक आहे. यातून आलेला पैसा व कामे मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेतून एकमेकांविषयी वैमनस्य आहे. त्याचा वचपा कधी ना कधी काही कारणांतून काढला जातो. ठाकुर्लीतील किशोर चौधरी यांची हत्या ही त्यातूनच झाली आहे. चौधरी हे इंटिरिअर डेकोरेशनची कामे घेत होते.
ठाकुर्ली, खंबाळपाडा, कांचनगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात बडी गृहसंकुले उभारली जात आहेत. भोईर राहत असलेल्या बालाजीनगर परिसरातील देवी शिवामृत इमारतीतील एका फ्लॅटच्या इंटिरिअर डेकोरेशनचे काम चौधरी यांना मिळाल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी भोईर बंधू यांना त्यांच्याविषयी आकस व चीड होती. ही चीड त्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून १८ गोळ्या झाडून काढली. चौधरी यांना ठार मारले. याशिवाय, त्यांच्या सहकाऱ्याचे अपहरण करून त्याचा वाटेत जीव घेतला. त्याचा मृतदेह महाडनजीक फेकून दिला. त्यामुळे हे दुहेरी हत्याकांड घडले.
ही घटना ताजी असताना आयरे गावातील विक्रांत केणे या तरुणाची जमिनीच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर लगेच रात्रीच आडिवली गावात हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार झाला. हळदी समारंभ, वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्वत:जवळ असलेल्या शस्त्रातून गोळीबार करण्याची फॅशन झाली आहे. अंबरनाथमधील एका कार्यक्रमात तर हवेत गोळीबार करताना गोळी चुकून एका लहान मुलाला लागली. त्याचा आरोप एका नगरसेवकावर आला.
चौधरी हत्याकांडानंतर सागाव परिसरात गोळीबाराचा प्रकार घडला. फार्महाउसमधील दोन गोण्या आंब्यांच्या वाट्यावरून एका भावाने दुसऱ्या भावाला मारहाण करून गोळीबार केला. वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे डोंबिवलीत पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी पोलीस कमी पडत आहेत. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर, पिस्तूल आणि बंदूक वापरण्याचा परवाना डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ६६८ जणांना दिला आहे. मात्र, परवाना दिलेल्या व्यक्तींच्या जीवाला खरोखरच धोका आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, गोळीबाराच्या घटनांमधील आरोपींनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार न करता दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे त्यांना दिलेला शस्त्राचा परवाना पुन्हा तपासला जावा. चुकीच्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दिलेला परवाना काढून घेण्याची गरज आहे.
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी राजकीय व्यक्तींचा दबाव वापरला जातो. एक शस्त्र परवाना मिळवण्यासाठी १० लाख रुपये पोलिसांना टेबलाखालून द्यावे लागतात, असे बोलले जाते. त्यामुळेच पोलिसांकडून शस्त्र परवान्यांची खिरापत वाटली आहे. परिणामी, शस्त्र परवाना वापरणाऱ्यांची डोंबिवलीत शेकडोंची संख्या समोर आली आहे.
गरजूंनाच संरक्षण मिळायला हवे
अनेकांना जीवाला धोका नसताना केवळ वचक निर्माण करण्यासाठी कमरेला रिव्हॉल्व्हर, पिस्तूल असावे, यासाठी ते सर्रासपणे शस्त्र परवाने घेऊन त्याचा वापर करत सुटले आहेत. यावर, पोलिसांनीच निर्बंध आणले पाहिजेत.
ज्यांच्या जीवाला खरोखरच धोका आहे, त्यांना मागणी करूनही पोलीस बंदोबस्त पुरवला जात नाही. बंदोबस्त सशुल्क पुरवला जातो. अनेकांना सशुल्क पोलीस बंदोबस्त अथवा पोलीस संरक्षण परवडत नाही.
त्यामुळे दरमहिन्याला सशुल्क भरण्याऐवजी एकदाच पैसा देऊन शस्त्र बाळगणे उचित समजले जाते. त्यातून ही शस्त्र परवाने घेण्याची प्रवृत्ती बळावत गेली आहे. या सगळ्यांची डोकेदुखी पोलिसांनाच होत आहे.
त्यावर, पोलिसांनीच नियंत्रण आणले पाहिजे, अन्यथा आणखी खून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोंबिवलीची ओळख साहित्य-संस्कृतीची नगरी अशी असली, तरी तिची दुसरी ओळख शहराची काळी बाजू मांडणारी आहे. दीड महिन्यापासून येथे सातत्याने गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. दोन हत्यांमध्ये परवानाधारी शस्त्रांचा वापर झाला. स्वसंरक्षणासाठी दिलेल्या शस्त्रांचा गैरवापर झाला आहे. त्याला पोलीस यंत्रणा आवर घालणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंबिवलीची काळी ओळख पुसण्याची जबाबदारी केवळ पोलिसांचीच नसून, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समाजघटकांचीही आहे.

Web Title: 'In the shoot' ... ... the cultural side of Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.