राज्याचे पहिले एआय धोरण लवकरच; उद्योग, व्यवसाय अन् तरुणांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:41 IST2025-01-02T10:40:25+5:302025-01-02T10:41:03+5:30
सह्याद्री अतिथीगृहावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला...

राज्याचे पहिले एआय धोरण लवकरच; उद्योग, व्यवसाय अन् तरुणांना फायदा
मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी विभागाला दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल, असे त्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेलार म्हणाले की, एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगार देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.
१० हजार कोटींचा निधी मंजूर
- मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी १०,३७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.
- केंद्र सरकार जानेवारी २०२५ पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे.
- यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधका ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे, असेही शेलार यांनी सांगितले.