...तरीही राजनला सोडणार नाही

By admin | Published: October 28, 2015 02:28 AM2015-10-28T02:28:23+5:302015-10-28T02:28:23+5:30

‘छोटा राजन हा इंडोनेशिया पोलिसांच्या ताब्यात असला, तरी त्याने स्वत:ला सुरक्षित समजू नये. आम्ही त्याला सोडणार नसून, त्याचा ‘गेम’ करण्यासाठी आमची माणसे टपलेली आहेत

... still will not leave to Rajan | ...तरीही राजनला सोडणार नाही

...तरीही राजनला सोडणार नाही

Next

मुंबई : ‘छोटा राजन हा इंडोनेशिया पोलिसांच्या ताब्यात असला, तरी त्याने स्वत:ला सुरक्षित समजू नये. आम्ही त्याला सोडणार नसून, त्याचा ‘गेम’ करण्यासाठी आमची माणसे टपलेली आहेत, त्याला भारतात आणले तरी मारू,’ अशी धमकी डी गँगच्या छोटा शकीलने दिली आहे.
‘मोस्ट वॉण्टेड’ यादीतील एक प्रमुख गुन्हेगार व अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला इंडोनिशियातील बाली येथे अटक झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून ही धमकी दिली. राजनच्या अटकेमुळे डी गँगचे पित्त खवळल्याने येत्या काही दिवसांत त्यांच्याकडून कारवाया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.
डी गँगकडून छोटा राजन २००० मध्ये बॅँकॉक येथे झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतरही त्याचा ‘गेम’ करण्याचे प्रयत्न सुरूच होते. राजनवर अनेक गुन्हे दाखल असल्याने, त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस, सीबीआय व केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहेत. केंद्र सरकारकडून त्याबाबत इंडोनेशिया सरकारशी संपर्क साधून, त्याला भारतात आणण्याची कार्यवाही केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर छोटा शकीलने दिलेल्या धमकीमुळे गँगवार भडकण्याची चिन्हे आहेत. धमकी देताना छोटा शकील म्हणाला,‘काही वर्षांपासून राजन आमच्या ‘टार्गेट’वर आहे. काही दिवसांपूर्वी फिजीमध्ये आमच्या माणसाकडून त्याचा खात्मा केला जाणार होता, त्यासाठी सगळी ‘फिल्ंिडग’ लावली होती. मात्र, त्याबाबत कुणकुण लागल्याने, तो घाबरून इंडोनेशियाला पळून गेला. ‘अपना फंडा क्लियर है, दुष्मन खतम हो, यही हमारा उसूल है’, त्यामुळे त्याला अटक झाली असली, तरी आमची त्याच्याबरोबरची दुष्मनी कायम आहे. इंडोनेशिया सरकारकडून भारताने त्याला ताब्यात घेतले, तरी आम्ही त्याला सोडणार नाही, त्याला नक्की मारू’ असेही शकीलने स्पष्ट केले. त्यामुळे राजनला भारताने ताब्यात घेतले, तरी त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे अंडरवर्ल्डवर एकतर्फी वर्चस्व ठेवण्यासाठी डी गँगकडून राजनच्या साथीदारांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘गेम‘च्या भीतीने छोटा राजनची शरणागती?
विविध विकारांनी त्रस्त असलेल्या छोटा राजनचा त्याच्याच टोळीवरील वरचष्मा गेल्या काही दिवसांपासून कमी झाला होता. जेलमध्ये असलेल्या डी.के.राव गेल्या काही काळापासून सर्व सूत्रे हलवत होता. त्यात डी गँगकडून हल्ल्याचा धोकाही कायम असल्याने, छोटा राजनने इंडोनेशियात शरणागती पत्करल्याचा कयास बांधला जात आहे. पुढे भारताने ताब्यात घेतले, तरी आपल्याला पुरेशी सुरक्षा मिळेल, याची खात्री असल्याने त्याने अटक करून घेतल्याचा अंदाज मुंबई पोलीस दलातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. २००० मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या हल्ल्यात राजन वाचल्यानंतरही त्याचा ‘गेम’ करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न झाले. मात्र, नेहमी सावध व पुरेशा सुरक्षा व्यवस्थेत वावरत असल्याने डी गँगच्या शूटर्सना तो गवसला नव्हता.
तोपर्यंत थांगपत्ताही नव्हता....
छोटा राजनच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांना जराही गंधवार्ता नव्हती. या योजनची कोणतीही माहिती मुंबई पोलिसांना शेवटपर्यंत देण्यात आली नव्हती. छोटा राजनवर मुंबईत खून, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
छोटा राजनच्या अटकेसंदर्भातील माहिती सीबीआयसह इतर सुरक्षा संस्थांना होती. तथापि, मुंबई पोलिसांना याची जराही गंधवार्ता नव्हती. रविवारी त्याला बाली (इंडोनेशिया) येथे जेरबंद करण्यात आल्याच्या वृत्ताला सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही अधिकृत दुजोरा दिल्यानंतर, इंडोनेशियाच्या पोलिसांनी राजनची छायाचित्रे जारी केली होती.
या कारवाईत सीबीआयसह भारतीय सुरक्षा संस्था, आॅस्ट्रेलिया आणि इंडोनिशया पोलिसांचा सहभाग होता. तथापि, मुंबई पोलिसांचा या आॅपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता. छोटा राजनच्या अटकेची योजना सीबीआयने आखली होती. सीबीआयच्या सूचनेनुसार आॅस्ट्रेलियन पोलिसांनी बालीतील पोलिसांना मोहन कुमार नावाच्या प्रवाशाबाबत तातडीने माहिती कळविली. त्यानंतर इंडोनेशियन पोलिसांना छोटा राजनला जेरबंद करण्यात यश आले.
छोटा राजनशी संबंधित कागदपत्रे शोधण्याचे आव्हान
मुंबई : गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियात अटक झाल्यानंतर देशात त्याच्यावर दाखल गुन्ह्णांबाबत चर्चा सुरू झाली आहे. १९८० ते ९० च्या दशकात छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल असून त्या संबंधीची बरीच कागदपत्रे शोधणे अवघड जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
छोटा राजनशी संबंधित खटले हे मुंबईच्या न्यायालयात असून याबाबतची कागदपत्रे आता शोधावी लागणार आहेत. छोटा राजनविरुद्धचे गुन्हे हे प्रामुख्याने १९८० ते ९० च्या दरम्यानचे आहेत. १९८० ते ८२ च्या काळात छोटा राजनविरुद्ध दहा गुन्हे दाखल आहेत, तर १९९० च्या काळात त्याच्या विरुद्ध एक डझन गुन्हे दाखल आहेत. छोटा राजन आणि दाऊदमध्ये वितुष्ट आल्यानंतर म्हणजे १९९३ ते १९९८ च्या सुमारास राजनविरुद्ध तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
छोटा राजनविरुद्ध १९८० च्या सुमारास जे गुन्हे दाखल आहेत ते प्रामुख्याने कलम ३०७, ३२४ आणि ३२६ नुसार आहेत. हत्येचा प्रयत्न करणे, धारदार शस्त्र बाळगणे आणि हल्ले करणे अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत. तथापि, १९९० च्या दशकात दाऊद गँगच्या एका व्यक्तीच्या
हत्या प्रकरणाची कागदपत्रे
मात्र शोधावी लागणार आहेत.
अनेक कागदपत्रे हरवली असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ... still will not leave to Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.