कर्जबाजारी व नापिकीमुळे राज्यात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Published: December 30, 2015 12:48 AM2015-12-30T00:48:57+5:302015-12-30T00:48:57+5:30
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
मुंबई : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
धुळे येथील शालीग्राम संतोष पाटील (४५) आणि वाळकी ता. चोपडा येथील अशोक गिरधर धनगर(नायदे) या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शालिग्राम पाटील यांच्यावर खासगी सावकारी तसेच हातउसनवारीचे कर्ज होते. ते २६ डिसेंबरला सकाळी घरातून बाहेर निघून गेले होते. सोमवारी सांजोरी शिवारातील शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. तसेच अशोक धनगर यांच्यावरही खासगी सावकाराचे व पतसंस्था, सोसायटीच्या कर्जाला कंटाळून त्यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली.
वर्धा जिल्ह्यामधील आष्टी येथील शेषराव पोकळे (६२) यांनी विहिरीत उडी घेऊन, तर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पेंढरीजवळच्या केवडा येथील शुभम कापटे (२२) याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अहमदपूर शिवारातील गुल्हाने याच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेहच आढळून आला. त्यांच्यावर बँकेचे एक लाखाचे कर्ज होते. तर शुभम याने विष प्राशन केल्यानंतर त्याला चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, सोमवारी पहाटे त्याचे निधन झाले.(प्रतिनिधी)