भिवंडीतच खटला चालणार
By Admin | Published: March 11, 2015 02:20 AM2015-03-11T02:20:03+5:302015-03-11T02:20:03+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे विधान करून संघ
मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे विधान करून संघ आणि संघ स्वयंसेवकांची बदनामी केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भिवंडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरु असलेला खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.
भिवंडी तालुक्यातील सोनाळे या गावी ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेतील भाषणात राहुल गांधी यांनी संघावर गांधी हत्येचा ठपका ठेवला होता. त्याबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश महादेव कुंटे यांनी दाखल
केलेल्या फौजदारी फिर्यादीवरून दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर भादंवि कलम ५०० अन्वये बदनामीचा खटला चालविण्याचा आदेश दिला होता व त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले होते. कुंटे यांची फिर्याद व त्यावर दंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करावा, यासाठी राहुल गांधी यांनी केलेली याचिका न्या. एम. एल. टहलियानी यांनी फेटाळली. त्यानंतर, निदान राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयात जातीने हजर न राहण्याची मुभा तरी द्यावी, ही विनंती राहुल यांच्या वकिलांनी केली. त्याबाबत न्यायमूर्तींनी सांगितले की, आधी याचिका प्रलंबित होती तेव्हा तसा आदेश मी दिला होता. आता तसे करण योग्य होणार नाही. त्यासाठी तुम्ही भिवंडी न्यायालयातच अर्ज करावा. (विशेष प्रतिनिधी)