भाजपची तलवार म्यान

By admin | Published: November 14, 2015 01:13 AM2015-11-14T01:13:51+5:302015-11-14T01:14:48+5:30

महापौर निवड : चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला ‘यू टर्न’; विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार

Sword sword of the BJP | भाजपची तलवार म्यान

भाजपची तलवार म्यान

Next

कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरवशावर अवलंबून राहिलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अचानक ‘यू टर्न’ घेत महापौरपदाच्या निवडणुकीत आपली ‘तलवार म्यान’ केली. गेले काही दिवस महापौर-उपमहापौर निवडणुकीत चमत्कार घडविण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी आता महापालिका सभागृहात भाजप-ताराराणी आघाडीने एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचे उपमहापौर होण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला भाजप किंवा ताराराणी आघाडीचा महापौर करण्यासाठी मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या जोरावर आम्ही ‘चमत्काराची भाषा’ केली होती; परंतु गुरुवारी त्यांनीच आता हे अशक्य असल्याचा निरोप पाठविला. त्यामुळे भाजप व ताराराणी आघाडीने महानगरपालिका सभागृहात ‘विरोधी पक्ष’ म्हणून भूमिका बजावण्याचे ठरविले आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे ४४ इतके संख्याबळ आहे, तर शिवसेनेचे चार नगरसेवक धरून भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक आहेत. संख्याबळाचा विचार करता काँग्रेस व राष्ट्रवादीचे महापौर-उपमहापौर होणार हे स्पष्ट असतानाही आठ दहा दिवसांपासून पालकमंत्री ‘भाजपचाच महापौर होईल’, असे ठामपणे सांगत होते; परंतु शुक्रवारी अचानक त्यांनी महापालिका सभागृहात भाजप-ताराराणीचे नगरसेवक एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून आपली भूमिका बजावतील, असे सांगून टाकले.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेतही सत्तेपर्यंत पोहोचण्यात अगदी काही जागा कमी पडल्या म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे सहकार्य मागितले होते. महानगरपालिकेत आम्ही सत्तेवर आलो तर शहराच्या विकासात अधिक सुसूत्रता आणि सोपेपणा येईल, एवढ्या एकाच हेतूने राष्ट्रवादीकडे सहकार्य मागितले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व माझे बोलणेही झाले होते. त्यांनी सहकार्य करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु काल त्यांनी अचानक राष्ट्रवादीने भाजपला किंवा ताराराणी आघाडीला सहकार्य करणे शक्य नाही, असा निरोप पाठविला. त्यामुळेच आम्ही भाजपचा महापौर करण्याची चर्चा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहात आमचे नगरसेवक प्रबळ विरोधक म्हणून भूमिका बजावतील. एक दबावगट म्हणून काम करतील.

घोडेबाजार ही आमची संस्कृती नव्हे
महापालिकेत नगरसेवकांना फोडून घोडेबाजार करणे ही आमची संस्कृती नाही. आम्हाला तसे करायचेही नाही. आमच्या चमत्कारात घोडेबाजार बसत नाही. ‘ताराराणी’चा महापौर करावा, आम्ही बाहेर थांबतो असा शेवटचा प्रस्ताव आम्ही राष्ट्रवादीकडे दिला होता. भाजप बाहेर थांबल्यास ते मदत करतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यासही नकार दिला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकत्रित १५ नगरसेवक येणार नसतील तर आपण विरोधी पक्षात बसावे, अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो. कोणावर दबाव टाकण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार नाही, असे पाटील म्हणाले.
श्रेयवादाचा विषय रंगणार
यापुढच्या काळात श्रेयवादाचा विषय चांगलाच रंगणार आहे, असे सांगून पालमंत्री पाटील म्हणाले की, कालच आम्ही शहर विकासातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत २६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. आता त्यास महानगरपालिकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ लागणार आहे. मनपा ते देणार की नाही; असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही २० कोटींचा निधी आणला तर तो खर्च करण्यासाठी याच मंडळींनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात राजकारण केले. अडथळे आणले म्हणूनच आम्हाला भीती वाटते की पुढील काळात श्रेयवादाचा विषय होईल.
१०० कोटींचा निधी थांबला
रंकाळा सुशोभिकरणाचा १०८ कोटींचा प्रस्ताव तयार आहे. त्यापैकी मिळालेल्या आठ कोटींच्या निधीचा हिशेब दिला नाही म्हणून पुढील १०० कोटींचा निधी यायचा थांबला आहे. महापालिकेच्या अशा असहकार्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे. राजकारणात हा फरक राहणार आहे. ज्या पक्षाची सत्ता येईल, त्यांनी शहराचा विकास करण्यावर जोर द्यावा. आम्ही त्यासाठी मुंबई, दिल्ली फेऱ्या मारणार नाही तरीही आम्ही काँग्रेसला चांगल्या कामात नेहमी सहकार्य करू . विकासात राजकारण करणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
खाई त्याला खवखवे
‘आम्ही चमत्काराची भाषा’ केली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘आम्हाला घोडेबाजार करू नका,’ म्हणून आवाहन करण्यास सुरुवात केली. ‘खाई त्याला खवखवे’ असं म्हणतात. वर्षानुवर्षे ज्यांनी घोडेबाजार केला त्यांनीच अशी भीती व्यक्त करावी; असे आवाहन करावे त्याचे आश्चर्य वाटते. सत्तेसाठी आम्हाला एवढा आटापिटा कशासाठी करता, असे विचारले जात आहे. मग तुमचा तरी का एवढा आटापिटा चालला आहे, असा सवाल पालकमंत्र्यांनी केला.
पत्रकार परिषदेस महानगर जिल्हाध्यक्ष महेश सावंत, आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, सत्यजित कदम, सुहास लटोरे आदी उपस्थित होते.
महापौरपदाची निवडणूक भाजप लढविणार
महानगरपालिकेतील सत्तेचा राजदंड हाती

Web Title: Sword sword of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.