प्रचार करणाऱ्यांवरही कारवाई करा
By admin | Published: May 19, 2016 05:10 AM2016-05-19T05:10:54+5:302016-05-19T05:10:54+5:30
१२ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेली मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी क्यूनेट पुन्हा एकदा चर्चेत आली
मुंबई : देशातील सुमारे १२ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेली मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी क्यूनेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोकांची लुबाडणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रचार सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार करत आहेत. त्यामुळे त्या कलाकारांची चौकशी करून सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार गुरूप्रीत सिंग आनंद यांनी केली आहे.
बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत गुरूप्रीत आनंद यांनी ही मागणी आर्थिक गुन्हे शाखा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या वेळी ‘आय ट्रस्ट क्यूनेट’ असे फलक घेऊन कंपनीच्या वितरकांनी पत्रकार परिषदेत मूक निदर्शने केली. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आझाद मैदान पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. काही काळ आझाद मैदानात ठेवल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.
पत्रकार परिषदेत गुरूप्रीत आनंद म्हणाले की, कंपनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून घोटाळा झाल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. तरी या घोटाळ्यात अनेक बड्या राजकीय नेत्यांसह केंद्र शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शिवाय कंपनीच्या काही संचालकांना पोलिसांनी लूक आऊट नोटीसही पाठवेलली आहे. तरीही कंपनीमार्फत मलेशियामध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात देशातील हजारो लोकांसह अभिनेता अनिल कपूरही निदर्शनास आला आहे. कंपनीने सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनिल कपूर या कंपनीत भागीदार झाल्याचे पोस्ट केले आहे. याआधी अभिनेता शाहरूख खान, आमीर खान, बोमन इराणी आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्यासह अनेक बड्या सिनेकलाकारांनी या स्कीमचा प्रचार केल्याचा आरोप गुरूप्रीत यांनी केला आहे. शिवाय त्याचे सर्व पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपुर्द केल्यचेही त्यांनी सांगितले.
>‘त्या’ कलाकारांनी देशाची माफी मागावी
क्यूनेटचा प्रचार करणाऱ्या आणि त्यातून पैसा कमावणाऱ्या कलाकारांनी देशाची माफी मागण्याची मागणी गुरूप्रीत यांनी केली आहे. शिवाय या स्कीममधून कमावलेला पैसा सरकारकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
शारदा चीटफंड घोटाळ्यात ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे नाव पुढे आले होते. त्या वेळी प्रचारासाठी मिळालेले सर्व पैसे मिथुन यांनी सरकारला परत केले होते. त्यामुळे या घोटाळ्यातून पैसा कमावलेल्या कलाकारांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे गुरूप्रीत म्हणाले.