“लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती”; ठाकरे गटातील नेत्याचे संजय राऊतांना समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:22 IST2025-01-11T14:21:47+5:302025-01-11T14:22:09+5:30
Thackeray Group Arvind Sawant News: निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे.

“लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती”; ठाकरे गटातील नेत्याचे संजय राऊतांना समर्थन
Thackeray Group Arvind Sawant News: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. याला ठाकरे गटातील नेत्यांकडून समर्थन मिळताना दिसत आहे.
मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणालेत. यावर आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना मोठे विधान केले आहे.
लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती
लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल तर अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावे. स्वबळावर लढावे, संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. शिवसेनेची ताकद अगोदरपासून होती. शिवसेना महापालिकेवर १९८५ पासून राज्य करत आहे. भाजपासोबत अनेकदा युती झाली नव्हती. मराठी माणसाचे अस्तित्व, अस्मिता, महाराष्ट्राचा धर्म बुडत आहे. सारेच विकले गेले आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो त्याला आव्हान देण्याची गरज आहे. ती महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांचा धर्म दाखवणे आवश्यक आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणतात की, एकटे लढलो असतो तर २० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या. निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे. एकटे लढले की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.