Maharashtra Politics: “शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:49 AM2023-04-04T10:49:54+5:302023-04-04T10:53:12+5:30

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

thackeray group mp sanjay raut letter to dcm devendra fadnavis on bjp mla rahul kul minister dada bhuse and kirit somaiya issues | Maharashtra Politics: “शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यातील राजकारण विविध मुद्द्यांवरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची संधी नेते मंडळी सोडत नाहीएत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तसेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

आताच (१ एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, “मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!” देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय ? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात, असे संजय राऊतांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी पत्रात आमदार राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमय्या  यांचा उल्लेख केल आहे. 

भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छितो

संजय राऊत पत्रात पुढे म्हणतात की, मी भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छितो. भाजपचे आमदार सन्माननीय राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान ५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो. 

त्या भ्रष्टाचाराबाबत आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो

तसेच आपल्या मंत्रिमंडळातील दादा भुसे (मालेगाव) यांनी 'गिरणा अॅग्रो' नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. व त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो.

कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी!

किरीट सोमय्या यांनी 'विक्रांत' युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना 'क्लीन चिट' दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे. वरील बेकायदेशीर प्रकरणांबाबत 'पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी!

दरम्यान, संजय राऊत यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली. महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणार, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: thackeray group mp sanjay raut letter to dcm devendra fadnavis on bjp mla rahul kul minister dada bhuse and kirit somaiya issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.