देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, उदय सामंतांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:40 AM2024-07-04T11:40:37+5:302024-07-04T11:41:14+5:30
सागरी महाविद्यालयाला ५०० ते ६०० कोटी तसेच विधी महाविद्यालयाला २५ कोटी खर्च येणार आहे.
![The approval of the first maritime university in the country by the Chief Minister, Uday Samant's information | देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, उदय सामंतांची माहिती The approval of the first maritime university in the country by the Chief Minister, Uday Samant's information | देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, उदय सामंतांची माहिती](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/sea-beach-ratnagiri_2024071260643.jpg)
देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, उदय सामंतांची माहिती
मुंबई : देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दूरदूश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना बुधवारी (दि.३) मंजुरी दिली आहे. सागरी महाविद्यालयाला ५०० ते ६०० कोटी तसेच विधी महाविद्यालयाला २५ कोटी खर्च येणार आहे. त्यालाही तत्वत: मान्याता देण्यात आली आहे. समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीत आता संधी उपलब्ध झाली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मानाची बाब आहे. त्यासाठी 50 एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.
यासंदर्भातील घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात कोकण दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे करणे प्रस्तावित आहेत. या विकासाअंतर्गत विविध योजनांसह रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली होती.
दरम्यान, भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येईल. ज्यात समुद्र विज्ञानापासून समुद्राचा इतिहास, नियम, संशोधन आदी विषयांचा अभ्यास करता येईल.