जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 07:59 IST2025-04-24T07:58:16+5:302025-04-24T07:59:38+5:30
श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल.

जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
Jammu Kashmir Attack: जम्मू-काश्मिरातील पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना श्रीनगरहून मुंबईकडे घेऊन येणाऱ्या पहिल्या विमानातील पर्यटकांची यादी अंतिम करण्यात आली असून यात ८३ प्रवासी गुरुवारी महाराष्ट्रात परत येणार आहेत. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीर इथं अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर आज श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. या प्रवाशांमध्ये कोणा-कोणाचा समावेश असणार आहे, याबाबतची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये शेअर केली आहे.
महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आणखी एका विमानाचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार करण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य शासन करणार आहे, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पर्यटकांना सुरक्षित घरी पोहचण्यासाठी सर्व विमान कंपन्यांशी बोलणे सुरू अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
दरम्यान, आज पहाटे ३.३० वाजता जम्मू-काश्मीरमधून मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने काही पर्यटक सुखरूप पोहचले आहेत.
महाराष्ट्रातील किती प्रवासी अडकले?
काश्मीरच्या पहलगामजवळील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. विमान व रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडले जात आहे. काश्मीरला महाराष्ट्र आणि गुजरातमधून सर्वाधिक पर्यटक भेट देतात. सध्या तेथे दोन्ही राज्यांतील सुमारे २० हजार पर्यटक असल्याची माहिती महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने (एमटीओए) दिली.