...मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? संजय राऊत यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 14:17 IST2018-11-05T14:16:42+5:302018-11-05T14:17:39+5:30
वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे.

...मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर निशाना साधला आहे. गेल्या चार वर्षांत कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर सरकारवरही गोळी झाडायची का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यासाठी हैदराबादहून शूटर मागविण्यात आले होते. राज्यात एवढे एन्काऊंटर झाले. त्यात बरेच खोटेही होते. वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आले असते. मात्र, वनमंत्र्यांनी ते मनावर घेतले नाही. भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी यावर आवाज उठवला याबाबत त्यांचे आभार मानत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तसेच उद्धव ठाकरे हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांची मुलेही आहेत. तसेच शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचेही राऊत म्हणाले.