प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य

By Admin | Published: November 15, 2015 01:59 AM2015-11-15T01:59:39+5:302015-11-15T01:59:39+5:30

मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेमार्ग हा तीन रेल्वे मार्गांमध्ये विस्तारलेला आहे. मध्य रेल्वेची मेन लाइन ही सीएसटी ते कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत, हार्बर मार्ग हा सीएसटी ते वाशी, पनवेल आणि

Top priority to safe travel of passengers | प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य

googlenewsNext

मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेमार्ग हा तीन रेल्वे मार्गांमध्ये विस्तारलेला आहे. मध्य रेल्वेची मेन लाइन ही सीएसटी ते कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत, हार्बर मार्ग हा सीएसटी ते वाशी, पनवेल आणि अंधेरी तर पश्चिम रेल्वेचा विस्तार चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. अशा या उपनगरीय रेल्वे आणि त्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्याचे काम हे जीआरपीवर (गव्हर्नमेन्ट रेल्वे पोलीस, लोहमार्ग) आहे. प्रवाशांची सुरक्षा, चोऱ्या, दरोडे रोखण्याबरोबरच या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करणे, अशी जबाबदारी चोखपणे सांभाळण्याचे आव्हान जीआरपी समोर नेहमीच असते. प्रवाशांशी सौजन्याने संवाद साधण्याबरोबरच जीआरपीच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हानही असते. जीआरपीच्या या सर्व प्रश्नांवर पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी ‘कॉफी टेबल’ या उपक्रमांतर्गत संवाद साधला. तेव्हा प्रवाशांचा सुरक्षित प्रवास हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, यापुढेही अधिकाधिक सुरक्षित प्रवासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
उपनगरीय रेल्वेचा पसारा खूप मोठा आहे. आपण याकडे कसे पाहता?
- उपनगरीय रेल्वे मार्गावर जवळपास ७५ लाखांपेक्षा प्रवासी दररोज प्रवास करतात. ठाणे, पुणे आणि नागपूर शहरातील लोकसंख्येपेक्षाही ही प्रवासी संख्या जास्त आहे. दिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असल्याने, त्यांची सुरक्षा हे आमच्यासमोरचे मुख्य आव्हान आहे. त्याचबरोबरीने गुन्हा होऊ नये किंवा गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी करता येईल, ते आम्ही पाहतो आणि तसा आमचा प्रयत्नही असतो. सीएसटीसारख्या स्थानकातून पिक अवरमध्ये एका मिनिटांत जवळपास सहा हजार प्रवासी बाहेर पडत असतात. हीच परिस्थिती अन्य गर्दीच्या स्थानकांचीही आहे. त्यामुळे या प्रवाशांची सुरक्षा करणे, हे आम्ही आव्हानच समजतो. आमचे पोलीस प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास तयार असतात.
प्रवाशांच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्यासाठी काही प्रयत्न करताय का?
- मनुष्यबळ कमी ही खरी बाब आहे. सध्या आमच्याकडे जवळपास ३,५०० रेल्वे पोलीस आहेत. आमच्या मदतीसाठी ५०० होमगार्डही मंजूर आहेत, पण ३०० ते ३५० होमगार्डच आम्हाला मिळतात. होमगार्ड ही एक ऐच्छिक काम करणारी संस्था आहे. त्यामुळे होमगार्ड कधी कामावर येतात तर कधी नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ५०० शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक मिळावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा प्रस्ताव आम्ही शासनाकडेही पाठवला आहे. या कॉर्पोरेशनची सुरक्षा सध्या मेट्रो आणि मोनो रेल्वेकडेही आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) दोन हजार जवान भरती झाले आहेत. या जवानांनाही उपनगरीय स्थानकांवर तैनात करण्यात आले आहे. त्यांचीही मदत आम्हाला मिळते. यासाठी आम्ही आरपीएफशी संवाद साधून आहोत.
जीआरपी, आरपीएफमध्ये सुरक्षेवरून वाद असल्याचे सांगितले जाते आणि ते दिसूनही येते...
- प्रवाशांची सुरक्षा व कायद्यावरून आमच्यात असा कोणताही वाद नाही. ते अबाधित ठेवण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जातात. प्रवाशांची सुरक्षा व गुन्हेगारी रोखणे हे आमचे काम आणि प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा हे आरपीएफचे काम आहे, ते आम्ही चोखपणे बजावतो. त्यामुळे कामाच्या स्वरूपावरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत.
‘पोलीस मित्र’संकल्पनेत प्रवासी संघटना सामावणार का?
- पोलीस मित्र संकल्पनेत बूटपॉलिश कामगार, डबेवाले, स्टॉलधारकांचा समावेश आहे, पण प्रवासी संघटना नाहीत ही खरी बाब आहे. यात प्रवासी संघटनानाही येत्या काळात सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना प्रवासी संघटनांचीही मदत मोलाची ठरू शकते. ती मदत वेळोवेळी घेतली जाईल. आम्ही व्हॉट्स अ‍ॅपसारख्या नव्या यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले जात आहोत.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे....
- महिला प्रवाशांची सुरक्षा ही महत्त्वाचीच आहे. त्यामुळे रात्रीच्या सुरक्षा वेळेत काही बदल करता येतील का? याचा विचार आम्ही करत आहोत. त्या दृष्टीने पाऊलही उचलण्यात आले आहे. आम्ही लोकलमधील महिला डब्यांबाहेर ‘रेल्वे पोलिसांच्या’माहितीचे पोस्टर्सही लावले आहेत. यातून डब्यात पोलीस असतो की नसतो, तसेच पोलीस असला, तर त्याची नेमकी वेळ कोणती? हे पोस्टर्सवर नमूद केले आहे. त्याचप्रमाणे डब्यात पोलीस नाही दिसला, तर रेल्वे पोलिसांचा नंबर देण्यात आला आहे. त्याप्रमाणे महिला ही माहिती फोनद्वारे नियंत्रण कक्षाला देऊ शकतात, याची तातडीने दखल घेऊन संबंधित डब्यात पोलिसांना पाठविले जाते.
मुंबईतील आणि अन्य शहरांतील रेल्वे स्थानकांवरील गुन्हेगारीचे प्रमाण कसे आहे? तसेच यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे का?
- मुंबईतील शहर व उपनगरीय स्थानकांवर पाकीटमारी आणि मोबाइल चोरीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, अन्य शहरातील रेल्वे स्थानकांमधील गुन्हेगारीशी तुलना केल्यास अन्य गुन्हे मुंबईत कमी आहेत. आम्ही गुन्हेगारी रोखण्यावर भर देऊन त्या दृष्टीने पावलेही उचलतो. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आहे. आपल्याकडे गुन्हेगारीत महिलांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. एकूण गुन्हेगारीच्या हे प्रमाण जवळपास २५ टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला डब्यांमध्ये महिला पाकीटमार मुंबईत आढळून येतात. त्यांच्यावर आमच्या महिला पोलिसांची करडी नजर असते.
रेल्वे स्थानकात गुन्हा घडल्यानंतर अनेक प्रवासी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी धजावतात. ही भीती कशी घालवणार?
-पहिली गोष्ट म्हणजे प्रवाशांनी तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. तक्रार दिली नाही, तर ‘त्या’गुन्हेगाराला एकप्रकारे प्रोत्साहन दिल्यासारखेच होईल. महत्त्वाची बाब म्हणजे, आमच्या पोलिसांना तक्रारदाराशी सौजन्याने वागणूक देण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्याची गरजही आहे. प्रवाशांशी कसे बोलावे, कसे वागावे आणि प्रवाशांची मन:स्थिती काय आहे? हे सर्व पोलिसांना प्रशिक्षणाद्वारे सांगितले पाहिजे. सॉफ्ट स्किल पोलिसांना अवगत करण्याची गरज आहे.
रेल्वे स्थानकांवर असलेल्या पोलीस स्टेशनची अवस्था फारच बिकट आहे?
- पोलीस स्टेशनची सध्या असलेली अवस्था आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चौकी पुरवण्याचे काम हे रेल्वे मंत्रालयाचे असते आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावाही करतो, तसेच आमच्याकडून शासनालाही वेळोवेळी माहिती दिली जाते. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लागतील, अशी आम्हाला खात्री आहे.
इस्थर अनुह्यासारखे प्रकरण घडले. अशा घटना होऊ नयेत, यासाठी रेल्वे पोलिसांची तयारी काय आहे?
-ती घटना अत्यंत वाईट होती. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे. या घटनेनंतर स्थानक हद्दीतील रिक्षा व टॅक्सी चालकांची माहितीही घेण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. ही माहिती वेळोवेळी अपडेटही केली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचीही मदत घेण्यात येते. महिला प्रवाशांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
फेरीवाले, भिकारी, किन्नर आणि कॅन्सर रुग्णांवरील उपचाराच्या नावाने पैसे मागणाऱ्यांचा उपद्रव लोकलमध्ये बराच असतो...
- किन्नरांकडून पैसे मागितले जातात आणि त्यामुळे प्रवासी हैराण
होत आहेत, याबाबतही तक्रारी
आल्या आहेत. त्या विरोधात कारवाई झाली आहे. अन्य घटकांकडून प्रवाशांना त्रास होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ, पण मुळात हे काम आरपीएफचे आहे. तरीही आम्ही आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न करू. जर पैसे उकळण्याचे काम होत असेल, तर फसवणुकीचे गुन्हे प्रसंगी संबंधितांवर दाखल करु.
प्रवाशांना काय संदेश द्याल?
- रेल्वे प्रवास करताना कायद्याचे उल्लंघन होता कामा नये, याची प्रवाशांनी काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ ओलांडू नये किंवा लोकलच्या दरवाजाजवळ तसेच टपावरुन प्रवास करू नये. यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात आणि एखादा संशयित व्यक्ती, तसेच सामान आढळल्यास तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्यात यावी. जर या प्रवाशांनी सतर्कता बाळागली, तर कोणताही मोठा गुन्हा रेल्वेत घडणार नाही.
(शब्दांकन - सुशांत मोरे)
रेल्वेतील गुन्हेगारीत सर्वांत मोठा आणि गंभीर प्रश्न आपण कोणता मानता? त्यासाठी तुमची काही विशेष योजना आहे का?
- दहशतवाद रोखणे हे आमच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणांबरोबरच प्रवासीही जागरूक राहिले पाहिजेत. कोणताही मोठा गुन्हा होऊ न देण्याचा निर्णय घेतला, तर रेल्वेतीलच काय, सगळ््याच गुन्हेगारीवर प्रतिबंध बसेल. दहशतवाद संपुष्टात येईल. आम्ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’सारखी संकल्पना राबवत आहोत. यात स्थानकांवरील डबेवाले, स्टॉलधारक, बूटपॉलिश करणाऱ्यांचा समावेश आहे. या माध्यमातून आम्हाला बरीच मदत होते आणि भविष्यातही होत राहील. आणीबाणीची परिस्थिती
कशी हाताळावी, याची माहिती आणि प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक निर्णयही आम्ही घेतला आहे. प्रत्येक स्थानकाची ‘सुरक्षा तपासणी’ केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यावर काम सुरू आहे. सुरक्षेत काय सुधारणा करता येतील, याची माहिती याद्वारे घेऊन तो शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
रेल्वे पोलीस ‘हायटेक’होण्यासाठी काय प्रयत्न करत आहात?
- रेल्वे पोलिसांची यंत्रणा हायटेक व्हावी, हे आम्ही उद्दिष्ट ठेवले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व्हॉट्स अ‍ॅपही उपलब्ध करून दिला आहे. बेवारस मृतदेहांना वारस उपलब्ध करून देणारी आम्ही शोधसारखी वेबसाईटही सुरू केली आहे. गुन्हेगारीचा विषय म्हटला, तर तपासाच्या दृष्टीने काही पावले उचलता येतात का? ते आम्ही पाहात आहोत. त्यामध्येही नवीन यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
स्थानकांवरील सीसीटीव्हींचा प्रश्न गंभीर आहे़?
- जवळपास ४२ स्थानकांवर सीसीटीव्ही अद्यापही नाहीत. तेथे सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी बैठक अलीकडेच झाली आहे. या बैठकीनंतरच त्या संदर्भात काम सुरू आहे. या सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग आरपीएफकडे असते.

Web Title: Top priority to safe travel of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.