दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By Admin | Published: July 20, 2015 02:03 AM2015-07-20T02:03:17+5:302015-07-20T02:03:17+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोन ठार आणि तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रविवारी दुपारी
खालापूर/लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोन ठार आणि तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रविवारी दुपारी ेसाडेअकराच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने प्रचंड वाहतूककोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाले.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मोटारीवर दरड पडल्याने मोटारीतील शशिकांत धामणस्कर (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीमधून बाहेर फे कल्या गेल्याने सुशीला धामणस्कर (४४) व मंगला माने (३५) जखमी झाल्या़ त्याच वेळी मुंबईहून पुण्याकडे येत असलेल्या मोटारीवर दगड पडल्याने दीपक पटेल (५२) व निर्मला पटेल (४८) हे जखमी झाले़ दिलीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दरडीचे दगड पसरल्याने मुंबई दिशेकडील वाहतूक ठप्प झाली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी पुणे दिशेकडील वाहतूकही बंद केली. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. रविवारमुळे लोणावळा, खंडाळ्यात आलेल्या पर्यटकांचेही हाल झाले.
जादा गाड्या
रेल्वेने व एसटीने तातडीने अधिक गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. रेल्वेने मुंबई व पुणे येथून रात्री उशिराने दोन अतिरिक्त दोन गाड्या सोडल्या होत्या. तर एसटीने खोपोली आणि तळेगाव येथून दोन्ही मार्गावर अतिरिक्त बसेस सोडल्या.
प्रवाशांचे अतोनात हाल
दोनच्या सुमारास पुणे लेनवरील दगड बाजूला करीत एक लेन पुण्यासाठी व एक लेन मुंबईसाठी खुली केली़ पुण्याकडे येणारी वाहतूक खोपोली गावातून जुन्या शिग्रोंबाच्या घाटातून सोडल्याने जुना घाटही ठप्प झाला होता़ दुतफर् ा १२ ते १५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक व प्रवाशांचे अतोनात हाल झाले़
रस्त्यांवरही वाहतूककोंडी
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविल्याने महामार्गही वाहतूककोंडीमुळे ठप्प झाला. खोपोली व खालापुरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर खोपोली, पेण व पालीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहतूककोंडी झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली होती.
वडिलांवर काळाचा घाला : मुंबईतील मीनल पटेल हिला भारती विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे़ सोमवारपासून कॉलेज सुरू होणार म्हणून तिला होस्टेलवर सोडण्यासाठी वडील दिलीप पटेल यांच्यासह पुण्याकडे येत असताना ही घटना घडली. सुदैवाने मीनल सुखरूप बचावली.
आयआरबीकडून दरड हटविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. परंतु सतत पडणारा पाऊस व वाहतूककोंडीमुळे कामात अडथळे येत होते. त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे वाहतूक सुरू करायची की नाही, याबद्दल पोलीस व आयआरबीमध्ये संभ्रम होता. वाहतूक सुरळीत होण्यास ८ ते १० तास लागले.
दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाखांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. - एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री
(वार्ताहर)