सरकारमधील दोन मंत्री अन् आंदोलनाचा डाव; जरांगेंच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:53 IST2025-02-19T14:45:57+5:302025-02-19T14:53:25+5:30
सरकारमधील दोन मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासाठी प्रतिआंदोलन केलं जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

सरकारमधील दोन मंत्री अन् आंदोलनाचा डाव; जरांगेंच्या आरोपाने खळबळ
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा सरकारसोबत संघर्षाच्या पवित्र्यात असल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आपण आणखी व्यापक करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. तसंच आपल्याविरोधात सरकारी पातळीवर षडयंत्र रचलं जात असून सरकारमधील दोन मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासाठी प्रतिआंदोलन केलं जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. तसंच याबाबतची माहिती सरकारमधीलच एका मंत्र्याने मला दिली, असंही त्यांनी सांगितलं आहे.
"मराठा आरक्षणाची चळवळ कमकुवत व्हावी, यासाठी सरकारमधील दोन मंत्री आंदोलन करणार आहेत. १३-१४ दिवस उपोषण करून सरकारकडून हे उपोषण सोडवलं जाईल आणि समाजाची दिशाभूल केली जाईल," असा दावा मनोज जरांगे यांनी धाराशिव इथं बोलताना केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी केलेल्या दाव्यानुसार खरंच राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी काळात उपोषण करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
"प्रत्येक गावात एक सेवक नेमणार"
"शहरांपासून ग्रामीण भागातील जनतेला समस्या, प्रश्न भेडसावत असतात परंतु, त्या समस्या कुणाकडे मांडायच्या? हा प्रश्न आहे. त्याकरिता राज्यातील प्रत्येक गावात एक सेवक नेमणार," अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव इथं बोलताना केली आहे.