कुशीत झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा सर्पदंशाने मृत्यू
By admin | Published: August 13, 2014 03:12 AM2014-08-13T03:12:21+5:302014-08-13T03:12:21+5:30
आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या दोन चिमुरड्यांचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या बावरवाडीत घडली.
किन्हवली : आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या दोन चिमुरड्यांचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या बावरवाडीत घडली.
आईच्या कुशीत अवघ्या चार महिन्यांची करुणा व वडिलांच्या कुशीत झोपलेला चार वर्षांचा करण यांना मध्यरात्रीच्या सुमारास विषारी सापाने दंश केला. चिमुरडीचा हात रक्तबंबाळ झाल्याचे पाहताच तिला लगेच डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले़ उपचारादरम्यान तिचे प्राण गेले. याच दरम्यान घरात चार वर्षांच्या करणच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्याच्या आजोबांनी पाहिले. त्यालाही तत्काळ डोळखांब येथे आणले असता प्राथमिक उपचार करून त्यास डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले; मात्र करणचा रस्त्यातच अंत झाला. सर्पदंशाची घटना घडल्यानंतरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी फिरकलेच नाहीत, अशी खंत स्थानिक नागरिक दत्तात्रेय वाख यांनी व्यक्त केली.
दोन महिन्यांपासून अंधारात शंभर घरांचे बावरवाडी हे गाव गेल्या दोन महिन्यांपासून अंधारात आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यासंदर्भात शेणवे वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही मंडळाचे अधिकारी अद्याप येथे फिरकलेले नाहीत. (वार्ताहर)