'दोघेजण फक्त चकरा मारताहेत, पाळणा काही हलेना'; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:02 IST2022-08-08T20:00:38+5:302022-08-08T20:02:33+5:30
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

'दोघेजण फक्त चकरा मारताहेत, पाळणा काही हलेना'; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
मुंबई:एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांच्या सरकारची स्थापना होऊन महिना उलटून गेला, पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन आता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.
संबंधित बातमी- 'शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर...', उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
'पाळणा हलत नाहीये...'
आज मातोश्री येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अनेक दिवसांपासून दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत, पण पाळणा काही केल्या हलत नाहीये. आता बातमी आली की, उद्या विस्तार होणार, पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार. जाउद्या, त्यांचं त्यांना लखलाभ. आता मी मैदानात उतरलोय. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई सुरू झाली आहे,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
'त्यांना युज अँड थ्रो केलं जातंय'
ठाकरे पुढे म्हणाले की, 'गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सगळे जोडले जात आहात. महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते अन् गद्दाराला गाडते. भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसलाय, त्या गद्दारांचे नामोनिशाण शिल्लक राहिल नाही. मात्र, भगवा तसाच फडकत आहे. गद्दारांच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची भाषा केली जात आहे. त्यांच्या लक्षात येईल कसं 'युज अँड थ्रो' केलं जातंय,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.