उद्धव ठाकरेंकडून मोदींना चिमटा तर राहुल गांधींचे कौतुक
By admin | Published: July 20, 2015 09:20 AM2015-07-20T09:20:39+5:302015-07-20T09:20:52+5:30
पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी थेट राहुल गांधींचे कौतुक केले आहे.
सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भारत - पाक संबंध व राहुल गांधी या विषयावर त्यांची भूमिका मांडली आहे. ईदनिमित्त भारतीय जवानांनी दिलेली मिठाई पाकिस्तानच्या जवानांनी परतावून लावली. मात्र पाकचे जवान हे विषच ओकणारे असून पाकचा जन्मच भारताद्वेषातून झाला आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांनी कितीही प्रेमबैठका घेतल्या तरी हे प्रेम खाली झिरपत नाही असे त्यांनी म्हटले आहे. हिरव्या सर्पांना दुध पाजून 'गोडवा' निर्माण करण्याचा फार्स वारंवार का केला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एकीकडे मोदींना चिमटा काढतानाच उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे कौतुक केले. राहुल गांधी सध्या कोणते च्यवनप्राश खातात हे माहित नाही, पण त्यांच्यात सभाधारिष्ट्य व चेह-यावर तेज दिसत आहे, त्यांचा जोश व उत्साह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींची स्तुती केली. राहुल गांधींची भाषणं चांगली असली तरी मामला अद्याप कोरडाच आहे, पण त्यांची शाळा चांगली चालू आहे. राहुल गांधींना फुटलेला कंठ हा विरोधाचा सूर आहे, तो शंखध्वनी होणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घ्यायला हवी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.