मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 08:52 AM2024-10-04T08:52:20+5:302024-10-04T08:52:59+5:30

हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती असंही राज ठाकरेंनी म्हटलं. 

Union Cabinet approved classical language status to Marathi, MNS Raj Thackeray welcomes Decision of PM Narendra Modi Cabinet | मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला

मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला

मुंबई - घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत सभेला आले होते. त्या व्यासपीठावरून राज ठाकरेंनी मोदींसमोर केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पहिली मागणी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन केले आहे. 

राज ठाकरेंनी म्हटलं की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेव्हा नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठिंबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत. भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५००-२००० वर्षं जुना हवा. या भाषेत प्राचीन साहित्य हवं. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती असंही राज ठाकरेंनी म्हटलं. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास काय होतं?

मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. 

भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. 

प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. 

महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालये सशक्त होतील. 

मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल. 

प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. 

अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. 

दरम्यान, या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे असं राज ठाकरेंनी सांगितले. 

मराठी जनांचे अभिनंदन 

प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन असं राज ठाकरेंनी कौतुक केले आहे. 

Web Title: Union Cabinet approved classical language status to Marathi, MNS Raj Thackeray welcomes Decision of PM Narendra Modi Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.