वसईत वऱ्हाडाची बोट उलटली

By admin | Published: February 29, 2016 04:46 AM2016-02-29T04:46:43+5:302016-02-29T04:46:43+5:30

पाणजू गावात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने ती नागाव खाडीकिनारी उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. २१ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील ५ जण अत्यवस्थ आहेत.

Vasayat Varhadah's boat got down | वसईत वऱ्हाडाची बोट उलटली

वसईत वऱ्हाडाची बोट उलटली

Next

शशी करपे, वसई
पाणजू गावात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने ती नागाव खाडीकिनारी उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. २१ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील ५ जण अत्यवस्थ आहेत. त्यात ३ मुलींचा समावेश आहे.
ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. बोट किनाऱ्यावर उभी असतानाच कलंडल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर पाणजू गावासह नवरदेवाच्या गावी शोककळा पसरली असली तरी हे दोनही विवाह संपन्न झाले. दरम्यान, या अपघाताची गंभीर दखल घेत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या गावात आज जयवंत भोईर आणि रवींद्र भोईर यांच्या मुलींचे विवाह होते. जयवंत भोईर यांच्या मुलीचे दुपारी दीडच्या सुमारास लग्न लागणार होते. गावात ये-जा करण्यासाठी एकच अधिकृत बोट आहे. मात्र, लग्नाला येणाऱ्यांची गर्दी पाहून भोईर यांनी गावातील दोन-तीन खाजगी बोटी ठेवल्या होत्या. सकाळी ११ वाजल्यापासून वऱ्हाडी यायला सुरुवात झाली. त्यामुळे जेट्टीवर मोठी गर्दी होती. दिलीप मोरेश्वर पाटील यांच्या बोटीत चढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे ३० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बोटीत ७०च्या आसपास लोक चढले. त्यामुळे ती कलंडली. त्यामुळे हाहाकार उडाला. किनाऱ्यावर अडीचशे-तीनशे वऱ्हाडींची गर्दी होती. तसेच पाणजू आणि नागाव परिसरातील मच्छीमार तिथे होते. आरडाओरड, गोंधळ आणि रडारड सुरू झाल्यानंतर सावध झालेल्या अनेकांनी मागचापुढचा विचार न करता पाण्यात उड्या मारून बुडालेल्यांना वाचविण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई विरार अग्निशमन दलाचे जवान आणि ८ अ‍ॅम्ब्युलन्स अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य वेळेवर झाल्याने बुडालेल्यांना लगेचच बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
>> चिखलामुळे अडथळे, स्कूबा डायव्हिंगचा बचावकार्यात वापर
वसई : गावात दोन लग्ने आणि क्रिकेटचे सामने होते. त्यामुळे गावात येण्यासाठी नागाव जेट्टीवर मोठी गर्दी होती. बोट उलटल्यानंतर सर्वांनीच मदतीसाठी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसलेल्या बोटीतून क्षमतेपेक्षा जास्त, ७०च्या आसपास प्रवासी भरले गेले होते. भरतीची वेळ, गढूळ पाणी आणि चिखल असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. पण, गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरळीत पार पडले. अग्निशमन दलाने स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून सर्च आॅपरेशन केले. तसेच घटनास्थळी ८ अ‍ॅम्ब्युलन्स ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, अशी माहिती पालिका फायरब्रिगेडचे प्रमुख भरत गुप्ता यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला हातभार लावला. आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, मदन किणी, शिवसेनेचे विवेक पाटील, काँग्रेस वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो, डॉमनिक डाबरे आदी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्ये मदतकार्यात सहभागी झाले होते. गरज पडली तर बाहेरचे डॉक्टर मागवा. कितीही खर्च झाला तरी मागेपुढे पाहू नका. पण, एकाचेही प्राण जाता कामा नयेत, असे आमदार ठाकूर हॉस्पिटल प्रशासनाला सांगत होते.
लग्न लागले साधेपणाने
रामचंद्र म्हात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू आणि पाच जणांच्या प्रकृतीला असलेला धोका वगळता सुदैवाने मोठ्या संकटातून सुटका झालेल्या पाणजू आणि बऱ्हामपूर गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. नवरदेव दीपेश पाटील हा अपघात झाला त्याच वेळी नागाव किनाऱ्यावर येऊन पोहोचला होता. त्यामुळे गावातील लग्नाचे विधी थांबविण्यात आले. त्यानंतर मुहूर्त साधून नागावकिनारी अगदी साधेपणाने दीपेश पाटील आणि निशा भोईर यांचा विवाह पार पडण्यात आला; तर संध्याकाळी रवींद्र भोईर यांच्या मुलीचे लग्नही साधेपणाने उरकण्यात आले.
.............................................
पाणजू पुलाचा प्रश्न ऐरणीवर
पाणजू : चारही बाजूंनी खाडीने वेढलेल्या पाणजू गावात ये-जा करण्यासाठी वाहतुकीचे अन्य साधन नाही. गावात असलेली एकमेव फेरीबोट हेच काय ते साधन आहे. पावसाळ्यात हाही मार्ग बंद असतो. तेव्हा जुन्या रेल्वेमार्गावरून जीवघेणी ३-४ किलोमीटरची पायपीट करून नागाव रेल्वे स्टेशन गाठावे लागते. विद्यार्थी, तरुणी, महिला, वृद्ध आणि रुग्णांची त्यामुळे फारच गैरसोय होत असते. ४ हजार लोकसंख्या असलेले पाणजू गाव प्राथमिक सुविधांपासून आजही वंचित आहे. आजच्या अपघातानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.
या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने आणखी मोठ्या अपघाताची वाट न पाहता एमएमआरडीएमार्फत होऊ घातलेले पुलाचे काम तातडीने सुरू केले पाहिजे; तसेच आजच्या अपघातातील मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे.
- विलास भोईर, उपसरपंच, पाणजू ग्रामपंचायत

दुर्घटनेत रामचंद्र बाबाजी म्हात्रे (५४, रा. दिवाणमान, वसई) यांचा मृत्यू झाला. २१ जण जखमी झाले असून, त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामधील फाल्गुनी पाटील, प्रीती वर्तक, दीपांशू घरत व एका लहान मुलीची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर नालासोपारा येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. जखमींपैकी मधुकर तांगडी, भावना शिंदे, नीलेश पाटील, मोहिनी पाटील, प्रतिभा घरत, आनंद लोकम, भीमा पाटील, हर्षांगी शिंंदे, संजीत पाटील यांच्यावर वसई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर बिंदू हरिदास, हितांशी पाटील, गीता पाटील, नलिनी पाटील, नूतन भरत घरत, प्रतीक्षा डी. वर्तक, भरत भोईर, करुणा धनाजी पाटील, दिलीप वर्तक यांच्यावर कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. - आणखी वृत्त/३

Web Title: Vasayat Varhadah's boat got down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.