VIDEO - 100 टक्के LED वापरामुळे देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 11:47 AM2017-06-10T11:47:34+5:302017-06-10T13:00:01+5:30

देशात सर्वांनी 100 टक्के LED दिव्यांचा वापर केला तर, देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील त्याचबरोबर 112 अब्ज युनिट वीजही वाचेल.

VIDEO - With 100 percent LED usage, the country will save 40,000 crore rupees | VIDEO - 100 टक्के LED वापरामुळे देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील

VIDEO - 100 टक्के LED वापरामुळे देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - देशात सर्वांनी 100 टक्के LED दिव्यांचा वापर केला तर, देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील त्याचबरोबर 112 अब्ज युनिट वीजही वाचेल असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित  ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ऊर्जा समिटचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
कोळसा आता सरप्लस असून, कोळसा आयात बंद करुन आपण स्वत: सक्षम झालो आहोत असे पीयूष गोयल यांनी सांगितले. सर्वांना 24 तास वीज मिळावी यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये लोकमतच्या या समिटमुळे मदत होईल असे सांगताना त्यांनी लोकमतच्या ऊर्जा समिट आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. 
 
आणखी वाचा 
 
18,500 गावाना 1 हजार दिवसात वीज पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता 600 दिवस झाले असून 3800 गावात वीज जोडणी बाकी आहे. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर छप्पर, पाणी आणि वीज देण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे गोयल म्हणाले. 
 
पीयूष गोयल यांनी मांडलेले मुद्दे 
- 100 टक्के LED वापरामुळे देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील, 112 अब्ज युनिट वीज वाचेल.
- सर्वांना 24 तास वीज मिळावी यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये लोकमतच्या या समिटमुळे मदत होईल.
- सरकार व जनतेमध्ये संवाद व्हावा यासाठी जवाहरलाल दर्डा यांच्यापासून ते ऋषी दर्डा यांच्यापर्यंत नेहमीच मदत झाली आहे, ही ऊर्जा समिट त्याचाच एक भाग आहे.
- कोळशाच्या तुटवडयाच्या बातम्या आता इतिहास जमा झाल्या आहेत, दररोज कोळसा नसल्यामुळे वीज निर्मिती कशी झाली नाही याची एकेकाळी आकडेवारी प्रसिद्ध व्हायची. 
- हे चित्र आता बदलले असून हे चित्र बदलण्यात जनतेचा विश्वास आणि अधिका-यांचे काम यांचा मोठा हात आहे, आता कोळसा सरप्लस झाला असून कोळशाची कमतरत संपली आहे आता कोळशाचा वापर कसा होईल याकडे लक्ष दिले जाते.
- आता कोळसा उत्पादनाचे नियमन करण्याचे काम सुरु आहे, पूर्वी लोकांना भारत कोळसा उत्पादनात सक्षम होईल असे वाटत नसे, पण आता कोळसा आयात बंद करुन, स्वत: सक्षम झालो.
- गेल्या तीनवर्षात सरकारने जास्त लक्ष दिले असेल तर शेतकरी आणि खेडयांना - पीयूष गोयल. 
- एखाद्या संकटात शेतक-याचे नुकसान झाले तर, शेतक-यांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी यासाठी फसल विमा योजना उपयुक्त ठरली - पीयूष गोयल. 
- गेल्या तीनवर्षात खताची एकदाही कमतरता भासली नाही, खत व्यवहारातील दलाल आम्ही नष्ट केले - पीयूष गोयल. 
- केवळ बजेटमध्ये घोषणा करणे आमचे उद्दिष्टय नाही, परिणाम काय येतात त्याकडे आम्ही लक्ष देतो. 
- पूर्वी बजेट पास व्हायला मे महिना उजाडायचा, खरा खर्च करण्यास वर्षातले शेवटचे काही महिने उरायचे, पण आता बजेटमधला खर्च करण्यास पुरेसा वेळ मिळतो.
- महागाई 12 टक्क्यावरुन सरकारने 3 टक्क्यावर आणली. 
- 2014 मध्ये चालू खात्यात तूट, महागाई जास्त होती. 
- स्वतंत्र भारतात सर्वात सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात चालू खात्यातील तूट, महागाई कमी झाली. 
  - जीएसटीमुळे सेवांचा दर्जा सुधारेल, वस्तूंच्या किंमती कमी होतील, पारदर्शकता वाढेल. 
- कोणत्या राज्यात वीजेचे दर किती, कुठले सरकार किती वीज खरेदी करते हे सर्व अॅपवर उपलब्ध आहे, समान दराने वीज राज्यांना उपलब्ध आहे. 
- 2019 पर्यंत सर्व LED वापरतील अशी स्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न. 
- माझे सगळे काम मोबाईलवर उपलब्ध आहे. 
- माहिती अधिकारापेक्षा सगळी माहिती मोबाईलवर मिळते. 
- आता मी बोलत असताना 24 कोटी एलईडी ब्लबची विक्री झाल्याची माहिती अपडेट झाली आहे. 
- पाचवर्षात 77 कोटी एलईडी ब्लब विकण्याचे उद्दिष्टय आहे. 
 
 
‘ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’, ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ आणि ‘फायनान्शियल हेल्थ ऑफ स्टेट डिस्कॉम्स-महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह’ या विषयांवर स्वतंत्र परिसंवादही होणार आहे.
 पहिल्या सत्रात ‘ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र पार पडेल. या चर्चासत्रात केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाचे माजी सचिव अनिल राझदान, एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक दीपक कोकाटे, स्टरलाईट पॉवरचे अध्यक्ष आणि मुख्य संचालन अधिकारी वेदमणी तिवारी आदी मान्यवर सहभागी होतील.
 दुसऱ्या सत्रात दुपारी १२.०० वाजता ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप जैन, ‘फर्स्ट सोलार’चे देशातील प्रमुख सुजॉय घोष, ‘रवीन ग्रुप ऑफ कंपनी’चे अध्यक्ष विजय करिया आदी मान्यवर मते मांडतील.
 तिसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता ‘फायनान्शियल हेल्थ ऑफ स्टेट डिस्कॉम्स-महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह’ या विषयावर टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदाना, रिलायन्स एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशीष बॅनर्जी, महावितरणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक या मान्यवरांचा सहभाग असेल.यासह ‘लोकमत ऊर्जा समिट’मध्ये देशासह राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी वीज कंपन्यांचे प्रतिनिधी आणि खासगी वीज कंपन्यांच्या प्रतिनिधीसह कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
 

Web Title: VIDEO - With 100 percent LED usage, the country will save 40,000 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.