VIDEO : महाराष्ट्राचे राजवस्त्र पैठणीला लागली उतरती कळा...

By admin | Published: July 25, 2016 02:14 PM2016-07-25T14:14:45+5:302016-07-25T14:43:34+5:30

येवला शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणा-या पैठणीला सध्या उतरती कळा लागली आहे.

VIDEO: Livelihoods of Maharashtra fall due to Paithani ... | VIDEO : महाराष्ट्राचे राजवस्त्र पैठणीला लागली उतरती कळा...

VIDEO : महाराष्ट्राचे राजवस्त्र पैठणीला लागली उतरती कळा...

Next

विणकर चिंतेत : रेशमाचे भाव वाढले ; पैठणीचे दर घसरले.
दत्ता महाले

ऑनलाइन लोकमत

येवला (नाशिक), दि. २५ -  येवला शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणा-या पैठणीला सध्या उतरती कळा लागली असून, ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या सहा ते सात महिन्यात रेशमाचे भाव १००० ते १२०० रुपयाने वाढले आहेत. त्यामुळे सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव १००० रुपयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे.
शेतक-याच्या कांद्याला अडतीचा दांडू अडवा आला आणि कांद्याचा वांधा झाल्याने शेतकरी अडचणीत आले. तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणी बाबत सध्या झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. पैठणीची घसरण सुरु झाल्याने आता शहराच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असून बाजारपेठ मंदावली आहे. जानेवारी महिन्यामध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रुपये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रुपये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता. तर डबल पदराला ५५०० रु पये भाव मिळत होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती.

घरी एक अथवा दोन हातमाग असणारांचे बरे चालले होते. परंतु गेल्या सहा  महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३५०० रुपये प्रती किलो झाले तर उभार रेशीम ३७०० रुपये प्रती किलो एवढे वाढले होते. आणि सध्या पैठणीच्या विक्री किमतीला घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४३०० रुपये भाव मिळत असून डबल पदरी पैठणीला ४८०० रुपये भाव मिळत आहे. पैठणीच्या बाबत मंदीचे सावट नेमके नैसर्गिक आहे की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहे.  सिंगल पदर पैठणी तयार करण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागतात. परंतु सध्या आठवडाभर काम करूनही केवळ ५०० ते ६०० रुपये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाला आहे.

भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात चार ते पाच तास काम विणकर करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकराकडून खरेदी करणे देखील व्यापा-यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर व पन्नास ते शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकराना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणवर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापा-यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्रीसाठी घेऊन जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही.  त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. स्थानिक व्यापारी बाजार पेठेतील उठाव पाहूनच भाव ठरवतात. सर्वसामान्य पैठणी उत्पादक विणकर व मजूर यांच्यात एकवाक्यता नसल्याने पैठणीचे व्यापारी कमी अधिक दराने पैठणी खरेदी करत असतात. शिवाय आठवडा भर पैठणीचा नग तयार करून त्यात जर काही चूक निघाली तर पुन्हा ४०० ते ५०० रुपयाने नगाचा भाव घसरतो. सध्या जेमतेम रोजीरोटी कशी बशी भागविण्याची परिस्थिती सर्वसामान्य विणकर व मजुरावर आलेली आहे.


केंद्र सरकारने रास्त भावात रेशीम उपलब्ध करून देण्यासाठी स्थानीक पातळीवर किमान चार ते पाच केंद्र सुरु करावे. महिलांचे राजवस्त्र म्हणून कागदावर पैठणीला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली असली तरी सध्या पैठणीची कलाकुसर तयार करणार्या सर्वसामान्य विणकराना सक्रीय कृतियुक्त दिलासा विविध योजना राबवून देण्याची गरज आहे. 400 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवास करणारी पैठणी मोठमोठ्या समारभव फॅॅशन शो मधून झळकत असली तरी या पैठणी व्यवसायाला घरघर लागली असून हवा तसा राजाश्रय मिळत नसल्याने पैठणीचे अर्थकारण सर्वसामान्य विणकराला अधोगतीकडे नेत आहे.

तळागाळातील विणकराना उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने अनुदानावर रेशीम द्यावे. पैठणीची खरेदी योग्य भावात व्यापा-यांनी करावी. वाढलेल्या वीजिबलामुळे विणकरांचे कंबरडे मोडले गेले आहे. पैठणी विणकरांसाठी अल्प दराने वीज पुरवठा करावा  - कार्तिक दत्तात्रय मुंगीकर, पैठणी विणकर,येवला.

Web Title: VIDEO: Livelihoods of Maharashtra fall due to Paithani ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.