जागांचा छप्पर फाडके ‘बोनस’
By admin | Published: July 28, 2014 01:26 AM2014-07-28T01:26:41+5:302014-07-28T01:26:41+5:30
बारावीच्या निकालात झालेली वाढ लक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार २०१४-१५ या सत्रात मंजूर प्रवेश क्षमतेच्या
विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र : यंदाच्या वर्षासाठी प्रवेश क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ
नागपूर : बारावीच्या निकालात झालेली वाढ लक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार २०१४-१५ या सत्रात मंजूर प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जास्त प्रवेशास मंजुरी दिली. परंतु ‘मागेल त्याला प्रवेश’ या धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना २५ टक्केपर्यंत प्रवेश क्षमता वाढवून देण्यासाठी मंजुरी देण्याची तयारी विद्यापीठाने दाखविली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून कळविले आहे.
यंदा बारावीचा निकालात १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत बीए, बीकॉम, बीएसस्सी सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांना महत्त्व आले. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम ८३ (३)(क) नुसार विद्यापीठाच्या प्रवेशक्षमता मंजुरीच्या अधिकारांतर्गत मंजूर प्रवेशक्षमतेच्या १० टक्के जास्तीच्या प्रवेशाचे निर्देश देण्यात आले. परंतु गरज पडल्यास महाविद्यालयांना जागा वाढवून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते.
त्यानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी विशेषाधिकारात महाविद्यालयांना २५ टक्केपर्यंत जास्त प्रवेशास मंजुरी देण्यास मान्यता दिली आहे.
यादी जोडणे आवश्यक
जागावाढीसंबंधी महाविद्यालयांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावे. यासंबंधी प्रस्ताव सादर करताना महाविद्यालयांना मंजूर क्षमतेनुसार प्रथम वषार्तील प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रमाणित करून प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक राहील. त्यानुसार महाविद्यालयांना प्रवेश क्षमता वाढवून देण्यात येईल. ही वाढीव क्षमता चालू सत्रासाठीच राहणार असल्यामुळे महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारची नवीन तुकडी तसेच अतिरिक्त पद मंजूर केले जाणार नाही, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.(प्रतिनिधी)