भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 06:26 PM2024-10-19T18:26:03+5:302024-10-19T18:28:40+5:30
राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.
Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतील या बैठकीनंतर सदर नेत्यांमध्ये चंदीगड इथंही एक बैठक पार पडली. मात्र चंदीगडमध्ये अमित शाह यांची राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री नक्की कोणार होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढू, मात्र मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय निवडणुकीनंतर आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडण्यात येत आहे. अशातच अमित शाह यांनी चंदीगड येथील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १५ ते २० मिनिटे स्वतंत्र चर्चा केल्याने त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेबाबतही भाजपचं केंद्रीय नेतृत्व समाधानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिमेचा अधिकाधिक वापर महायुतीने करून घ्यावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
भाजपची पहिली यादी दोन दिवसांत?
भाजपमध्ये दोन डझन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली आहे. त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे. भाजपची पहिली यादी गुरुवारीच जाहीर केली जाणार होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती अडली आहे. तरीही, आमची पहिली यादी दोन दिवसांत येईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नुकताच केला आहे.