"चिल्लर लोकांच्या गाड्या का फोडता? 'या' ४ नेत्यांच्या फोडा", प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 06:19 PM2024-08-02T18:19:20+5:302024-08-02T18:21:15+5:30

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यातील चार नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन केलं आहे.

"Why do you break the cars of Chillar people? Break the 'these' 4 leaders", Prakash Ambedkar's appeal | "चिल्लर लोकांच्या गाड्या का फोडता? 'या' ४ नेत्यांच्या फोडा", प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य

"चिल्लर लोकांच्या गाड्या का फोडता? 'या' ४ नेत्यांच्या फोडा", प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता वंचित बहुनज विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यातील चार नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन केलं आहे. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत? अजित पवार गटात आहे. जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत? शरद पवार गटात आहेत. गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा. एक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दुसरं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरं नाव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चौथं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या नेत्यांच्या गाड्या फोडा. या चिल्लरफाल्लरांच्या काय गाड्या फोडता?", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा राग मनात धरुन संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी काल दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड केली होती. याप्रकरणी आता अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली होती. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असं वक्तव्य केलं होतं. अमोल मिटकरी यांनी केलेली टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात संताप व्यक्त करत अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती.

Web Title: "Why do you break the cars of Chillar people? Break the 'these' 4 leaders", Prakash Ambedkar's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.