उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? नाराजीमुळे जय महाराष्ट्र करणार? राजन साळवी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:20 IST2025-01-02T12:16:19+5:302025-01-02T12:20:46+5:30
Thackeray Group Rajan Salvi News: राजन साळवी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत राजन साळवी यांनी सूचक विधाने केली आहेत.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? नाराजीमुळे जय महाराष्ट्र करणार? राजन साळवी म्हणाले...
Thackeray Group Rajan Salvi News: एकीकडे महायुतीमधील नेते, आमदार नाराज असल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही नेते आणि आमदार महायुतीत येऊ शकतात, असे दावे करणारी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असून, नाराज असलेले राजन साळवीउद्धव ठाकरेंची साथ सोडून पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. याबाबत राजन साळवी यांनी भाष्य करताना सूचक विधान केले आहे.
सन २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजन साळवी उद्धव सेनेकडून निवडणूक रिंगणात होते. परंतु, त्यांना पराभावाचा सामना करावा लागला. तसेच राजन साळवी यांच्या मागे सातत्याने तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे. अनेक कारणांवरून नाराज असलेले राजन साळवी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असून, शिवसेना शिंदे गट किंवा भाजपामध्ये जाणार असल्याचे दावे केले जात होते. त्यानंतर आता खुद्द राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना
पिकल्या आंब्यावर दगड मारले जातात. तसा प्रयत्न भाजपाकडून केला गेला असेल. माझ्याशी अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही. पक्षात येणाऱ्या माणसाचे स्वागत करणे प्रत्येक पक्षप्रमुखाचे कर्तव्य असते. पण मतदारसंघात आणि जिल्ह्यात माझ्या संघटन कौशल्यामुळे मी यावे असं वाटत असेल. त्यामुळे त्यांची अपेक्षा असेल. ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ मध्ये झालेल्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. मीडियातून मला समजले की, मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काही नाही. रोजच्या कामात माझे मार्गक्रमण सुरू आहे. अशा बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही, असे राजन साळवी यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मुंबईत मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली होती. तिथे पराभवाचे कारण आणि आत्मचिंतन करण्यात आले. तेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, अशी माहिती देताना, एसीबीची चौकशी सुरू होती. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडून निर्णय सुट्टीनंतर अपेक्षित आहे. आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहिती आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.