२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का? बागेश्वर बाबांचे सूचक विधान, “हिंदू राष्ट्र बनण्यासाठी...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:14 AM2023-11-07T11:14:44+5:302023-11-07T11:16:13+5:30

Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघणार, या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

will you contest the 2024 lok sabha elections reaction of bageshwar dham dhirendra krishna shastri | २०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का? बागेश्वर बाबांचे सूचक विधान, “हिंदू राष्ट्र बनण्यासाठी...”

२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का? बागेश्वर बाबांचे सूचक विधान, “हिंदू राष्ट्र बनण्यासाठी...”

Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा सध्या देशभरात अनेक ठिकाणी दिव्य दरबार भरवत आहेत. हजारो-लाखो भाविक या दरबारांना उपस्थित राहत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी मीडियाशी बोलताना बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षण, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान, लोकसभानिवडणूक यासह अन्य विषयांवर स्पष्ट शब्दांत मते मांडली. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान तुम्ही स्वीकारत नाही असा आरोप होत आहे, असे विचारले असता धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान फक्त माध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी असते. कोणतेही प्रश्न, वादविवाद हे मीडियात बोलून सुटत नाहीत. तुमचे कुठे दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागते. माझ्याबाबतीत तुम्हाला काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या, हेच मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहे. मी नागपुरात आलो, मुंबईत आलो; पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही. मी छत्रपती संभाजीनगरात त्यांना आवाहन करतो, येथे तीन दिवस आहे. काही तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करायला या, असे बागेश्वर बाबा यांनी सांगितले. यावेळी बागेश्वर बाबांना सन २०२४ ची लोकसभानिवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 

२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का?

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता बागेश्वर बाबांनी नकारार्थी उत्तर दिले. निवडणुका लढवून हिंदू राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही. २०१० पर्यंत देशात हिंदू शब्द उच्चारण्याची भीती वाटत होती. आता सनातन धर्माबद्दल चेतना निर्माण झाली आहे. सामाजिक समरसता, विश्वशांती, राष्ट्रभक्ती म्हणजे हिंदू धर्म ही व्याख्या आता देशवासीयांमध्ये रुजली आहे. त्यामुळे आता हिंदूराष्ट्र निर्मितीची मागणी होत आहे, असे बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघणार, या प्रश्नावर सावध पवित्रा घेत कोणत्याही बाबांच्या जीवावर राजकारण्यांना निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे विजयाची चिठ्ठी आपण काढत नाही, असे बागेश्वर बाबा यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, देश गुलामीत होता. त्या कठीण परिस्थितीत ज्या शूरवीरांनी आपली भारतमाता गुलामीतून मुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला, त्यात सर्वाधिक योगदान मराठा समाजाचे होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी बागेश्वर पीठाची मागणी आहे. सरकारला आवाहन करतो की, त्यांनी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशा शब्दात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला.
 

Web Title: will you contest the 2024 lok sabha elections reaction of bageshwar dham dhirendra krishna shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.