येऊरचा विवेकानंद बालआश्रम संकटात
By admin | Published: August 13, 2014 03:07 AM2014-08-13T03:07:06+5:302014-08-13T03:07:06+5:30
महिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे.
नामदेव पाषाणकर, घोडबंदर
महिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे. आश्रमाच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने नको ती कारणे दाखूवन तो बंद करण्याचा घाट काही कथीत राजकारण्यांनी प्रशासनास हाताशी धरून रचला असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे आश्रमात शिक्षण घेणा-या ६५ विद्यार्थ्यांवर बेघर होेण्याची नामुष्की ओढवली आहे.
निसर्गरम्य येऊर परिसरात ३२ वर्षापासून सदर आश्रम आर्थिक दुर्बल घटक विभक्त कुटुंब, आईवडिल नसलेले किंवा दोन्हीपैकी एक मयत असलेल्या कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलांसाठी वरदान ठरला आहे़ या आश्रमाच्या आवारात मंदिर, गोशाळा असल्यामुळे धार्मिक वातावरणात ही मुले आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आश्रम संस्था अनुदानित असली तरी आतापर्यंत शासनाकडून मात्र याला अद्याप अनुदान मिळालेले नसल्याचे विश्वस्तांचे म्हणने आहे. दानशूर लोकांनी दिलेल्या मदतीवर हा आश्रम सुरू आहे.
आश्रमाची जागा केंद्र सरकारकडून ४० वर्षांच्या भाडेकरारावर घेण्यात आली आहे. ६ ते १८ वयोगटातील ६५ मुले गतवर्षापर्यंत येथे आश्रयाला होती़ मात्र, एप्रिलमध्ये आश्रमाची मान्यता रद्द केल्याचे पत्र संस्थेला मिळताच खळबळ उडाली होती. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व मुलांना नाईलाजास्तव आश्रम सोडून जावे लागले होते. मुलांना मळकट कपडे, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि खेळाचे मैदान नसल्याचा ठपका ठेवून आश्रमाची मान्यता रद्द करण्यात आली. आश्रमाची मान्यता रद्द केली असताना तेथे जर मुले असतील ते कृत्य बेकायदा आहे. तसेच आश्रम संदर्भात मंत्री महोदयांनी विभागीय उपायुक्त कोकण विभाग, उपायुक्त बालविकास आयुक्तालयच, पुणे व उपमुख्य अधिकारी यांना १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले असल्याचे ठाण्याचे महिला व बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.