लोकल अपघातात तरुणाने गमावले पाय
By admin | Published: September 29, 2014 07:35 AM2014-09-29T07:35:08+5:302014-09-29T07:35:08+5:30
रेल्वेरूळ ओलांडू नये, असे आवाहन उद्घोषणेद्वारे रेल्वे प्रशासनाकडून करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम अनेक प्रवासी करतात आणि अशा प्रवाशांना अखेर अपघाताला सामोरे जावे लागते
मुंबई : रेल्वेरूळ ओलांडू नये, असे आवाहन उद्घोषणेद्वारे रेल्वे प्रशासनाकडून करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम अनेक प्रवासी करतात आणि अशा प्रवाशांना अखेर अपघाताला सामोरे जावे लागते. अशाच एका २१ वर्षीय तरुणाला लोकलची धडक लागल्याने दोन्ही पाय गमवावे लागल्याची घटना टिळकनगर स्थानकाजवळ घडली.
चेंबूर, आदर्शनगर येथे राहणारा नरेंद्र कोरवाल २७ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ चेंबूर बाजूकडील फूटब्रीजच्या खालून रूळ ओलांडत होता. त्याचवेळी एका लोकलने कोरवालला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचे दोन्ही पाय वेगळे झाले व रुळावर तो बेशुद्धच पडला. घटनेची माहिती रेल्वे पोलीस आणि स्टेशन मास्तरला मिळताच त्यांनी तात्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले आणि त्यानंतर तेथून पुढे सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचे दोन्ही पाय गेल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याबाबत वडाळा रेल्वे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे म्हणाले, की लोकलमधून पडल्यास दोन्ही पाय गमावणे अशक्य आहे. हा
अपघात रूळ ओलांडतानाच झाला आहे. (प्रतिनिधी)