त्याला देव तारी

By admin | Published: June 14, 2014 06:13 PM2014-06-14T18:13:53+5:302014-06-14T18:13:53+5:30

पंढरपूरची विठ्ठलाची वारी हा एक आनंद सोहळा असतो. विठ्ठलभेटीची आस घेऊन वारकरी शेकडो मैल चालत जातात. गरीब बापडा शेतकरीही ‘ग्यानबा-तुकाराम’च्या तालावर दु:ख, दैन्य विसरतो. लाखोंच्या साथीने हा भक्तांचा मळा फुलत जातो.. येत्या २0 जूनपासून हा भक्तीचा सागर आळंदीतून पंढरपूरकडे निघेल. त्यानिमित्ताने..

God bless him | त्याला देव तारी

त्याला देव तारी

Next

- प्रा. रामचंद्र गोहाड

 
बाराव्या शतकापर्यंत समाजात जातीपाती, भेदभाव, श्रेष्ठ-कनिष्ठ, लिंगभेद बोकाळलेले होते. व्रतवैकल्ये, कर्मकांड यांना ऊत आलेला होता. हिंदू धर्मात धर्मग्रंथ म्हणून ‘श्रीमद्भगवद्गीता’ साक्षात भगवान गोपाळकृष्णांनी कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला उपदेशात्मक रीतीने सांगितली. तथापि, हा ग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने त्यातील व्यावहारिक तत्त्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत-समाजापर्यंत पोहोचत नव्हते.
भागवत संप्रदाय १२व्या शतकाच्या आधी स्थापन झाला होता. तथापि, त्यामध्ये असणारी जागरूकता सर्व समाजात पसरली नव्हती. धर्माला ग्लानी आलेली होती व भगवंताच्या सर्वसमावेश अवताराची गरज भासत होती. याच वेळी श्रावण वद्य अष्टमीला रात्री १२ वाजता भगवान गोपाळकृष्णांनी आळंदीक्षेत्री अवतार घेतला तो संत ज्ञानेश्‍वरांच्या रूपाने, अशी श्रद्धा आहे. संत ज्ञानेश्‍वर समाजात वाढत होते, मिसळत होते; परंतु त्या वेळी त्यांच्या लक्षात आले, की संस्कृत ग्रंथांची भाषांतरे प्रादेशिक भाषांमध्ये नव्हती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांनी ही उणीव भरून काढली. पैठणहून आळंदीला येताना नेवासेक्षेत्री १८ अध्यायी भगवद्गीतेचे भाष्य प्राकृतात करून ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी निर्माण केली. ७00 श्लोकांचा विस्तार ९,0३३ ओव्यांत करून वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी एवढय़ा अगाध ज्ञानाचा आविष्कार माऊलींनी दाखविला. ज्ञानेश्‍वरमहाराजांच्या समाधीनंतरही भागवत संप्रदायातील वारकरी पंढरपूरची वारी करीत होते. वारकर्‍यांचा समूह असा नसायचा; तथापि ठराविक तिथीला निघायचे व तिथून पुढे समूह होऊन एकत्र जायचे. जगद्गुरू तुकाराममहाराजांनी आळंदीला जाऊन माऊलींच्या पादुका पालखीमध्ये घालून वारी सुरू केली. हा परिपाठ कायम होता. त्याच्यामध्ये वाढही होत होती. त्यानंतरच्या काळात तुकाराममहाराजांच्या पादुका घेऊन वारकरी आळंदीला यायचे व दोन्ही पादुकांची पालखी सोबतच काढायचे. विठ्ठलाच्या ओढीने वारीतून जाणार्‍या वारकर्‍यांमध्ये सातत्याने वाढ होत गेली. दिंड्या वाढत गेल्या. मूळ भागवत धर्माचे वारकरी होते. त्यांच्या ज्ञानाच्या प्रसारामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये दिंड्यांचा प्रसार सुरू झाला. दोन-दोन, चार-चार गावांतील वारकरी एकत्र येऊन वारीमध्ये अत्यंत श्रद्धेने सहभागी होऊ लागले. तुकाराममहाराजांनी जे अभंग लिहिले ते आजही वारीमध्ये दररोज संध्याकाळी म्हटले जातात. ज्ञानेश्‍वरमहाराजांनी तुकाराममहाराजांना परमशिष्य मानले होते. या हृदयीचे त्या हृदयी घातले. हा भक्तांचा अनोखा सोहळा वारीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. एकात्मकतेचा अद्भुत संदेश यानिमित्ताने अवघ्या जगाला दिला जातो. राज्यभरातून विविध भागांतून एकूण ४३ पालख्या निघतात. या सार्‍या पालख्या वाखरीला जमतात. तिथे उभे रिंगण होते व तिथून सारे जण भक्तिभावाने पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. 
सर्व संतांचे गुरुदैवत म्हणजे पंढरीचे श्रीविठ्ठल देव. आपल्या भारताची परंपरा कृषिवल आहे. भारतातील गरीब, अडाणी शेतकरी हाच या वारीतला वारकरी आहे. शेतकरी हाच जमिनीचा मालक व त्याची मशागत करणे हे त्याचे काम. नोकरीमध्ये ठराविक तास काम केले, की बाकी वेळ मोकळा. सबब, मोकळा वेळ म्हणजे कुटाळक्या करणे, मत्सर करणे, मारामार्‍या करणे, समाजात अशांतता निर्माण करणे, असे उद्योग होत राहायचे. परंतु, आपली संतपरंपरा, ऋषिपरंपरा, गुरुकुल पद्धती आणि सर्वांत जास्त भागवत संप्रदाय- वारकरी संप्रदाय यांनी त्याला भक्तिमार्ग दाखविला आणि जीवनात अनुसरायला लावला. 
आजही या वारकर्‍यांमध्ये सामान्यांतील सामान्य व्यक्ती सामील आहे. आषाढवारी म्हणजे मृग नक्षत्रामधील शेतातील पेरणी केल्यावर १५-२0 दिवस शेतकर्‍यांना अन्य काम नसते. सामाजिक व आर्थिक बाबी लक्षात घेता, देशाटन करणे हादेखील भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच आपल्याकडे, चारधाम यात्रा करणे, काशी-रामेश्‍वर इ. तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे या प्रथा सुरू झाल्या; परंतु त्यात सर्व समाज सहभागी झालेला दिसत नाही. वारीमध्ये मात्र लोक जातपात, धर्म, उच्च-नीचता विसरून एकत्र येतात. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतात. चालीरीतींचा अभ्यास करतात.
आता पावसाळ्याची चाहूल लागली आहे. शेते नांगरून तयार आहेत. पीकपाण्यास उपयोगी म्हणून वारीचे प्रशासन अत्यंत उपयोगी आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीस आषाढवारी सुरू होते. आळंदीहून माऊलींची पालखी दुपारी प्रस्थान ठेवते. संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला होते. या वारीचे एकच लक्ष्य म्हणजे पंढरपूरचे श्रीविठ्ठल दैवत. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठय़ा यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी २५0 किलोमीटर प्रवास पायी केला जातो. त्यासाठी रोज १0 ते १६ किलोमीटर चालले जाते. असे १३ मुक्काम व १८ दिवस वारी चालते. 
वारीचे नियोजन हे इतके शास्त्रशुद्ध पद्धतीने  केलेले आहे, की त्याला तोड नाही. माऊलींच्या पालखीचा रथ मध्यभागी असतो. त्यामध्ये २७ दिंड्या मानाच्या. रथाच्या मागे सुमारे २५0 ते ३00 दिंड्या. त्याला संस्थानाने नंबर दिलेले असतात. वारीच्या प्रशासनासाठी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरमहाराजांच्या आळंदीच्या समाधी मंदिराची पूजाअर्चा, देखभाल दुरुस्ती, वार्षिक सर्व सण, आषाढवारी, कार्तिकवारी, समाधी, उत्सव इ. सर्व बाबींसाठी ब्रिटिश शासनाने १८५२मध्ये जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अधिपत्याखाली संस्थानाची स्थापना केली. त्यांनी ६ पदसिद्ध विश्‍वस्तांची नेमणूक करणे, प्रत्येक विश्‍वस्ताचा कालावधी ७ वर्षे असतो. त्यानंतर हिंदू एंडाऊमेंट कायद्यान्वये संस्थानाचे सर्व प्रशासन जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्याकडे आले. सबब, विश्‍वस्तांच्या नेमणुका त्यांच्याकडून होतात. संस्थानाला छत्रपती शिवाजीमहाराजांनी आळंदी-केळगाव ही गावे इनाम दिलेली आहेत. तथापि, संस्थानाला यामधून काहीही महसूल मिळत नाही. संस्थानाचा खर्च पेटीमधील जमा पैसे, देणग्या यांवर भागतो.
प्रत्येक दिंडी प्रत्येक विसाव्याच्या जागेवर थांबते, त्या वेळी दिंडीच्या एकूण जथ्यामधून बाजूला जाते. तथापि, जेव्हा विसावा वेळ संपतो, त्या वेळी संस्थानातर्फे नेमलेला कर्णेकरी कर्णा वाजवितो व तिसरा कर्णा संपल्यावर पुन्हा संबंध दिंड्या ओळीने चालत मार्गक्रमण करतात. माऊलींनी रचलेल्या ओव्या, अभंग, हरिपाठ या सर्वांचे पठण वारीमध्ये चालता-चालता केले जाते. हरिपाठाचे पठण तीन वेळा होते.  संपूर्ण वारी हा आनंद सोहळा असून, प्रत्येक वारकरी त्याचा आनंद घेत असतो. या एकूण प्रवासाला लोणंद येथे (१00 कि.मी. अंतरावर) पहिले उभे रिंगण होते. त्यानंतरचे रिंगण सदाशिवनगर येथे गोल रिंगण असते. एकूण या सोहळ्यात ३ उभी रिंगणे व ४ गोल रिंगणे होतात. त्यामध्ये माऊलींचा अश्‍व हा धावत असतो व दुसर्‍या अश्‍वावर माऊलींचे रक्षण करणारा स्वार असतो.
यामध्ये घोडेस्वार व माऊलींचा अश्‍व ही संकल्पना अशी असते, की संपूर्ण सोहळ्याच्या अग्रभागी २ अश्‍व असतात. एका अश्‍वावर माऊली बसलेल्या आहेत व त्यांच्या रक्षणासाठी दुसरा अश्‍व स्वारासह. त्याच्या मागे २७ दिंड्या, मग पालखी असलेला रथ, त्यामागे उर्वरित २५0-३00 दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीची रचना अशी असते. 
अग्रभागी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेली महिला. त्यानंतर महिला वारकर्‍यांच्या ओळी. त्यांच्या संख्येप्रमाणे एका ओळीत ५ महिला, त्यानंतर मृदंग व वीणाधारी व त्यांच्या मागे पुरुष वारकर्‍यांच्या ओळी. प्रत्येक दिंडीत किती पुरुष वारकर्‍यांच्या ओळी, प्रत्येक दिंडीत किती पुरुष वा महिला, यावर बंधन असते. साधारणत: आळंदी ते पुणे हा प्रवास २0/२२ कि.मी. आहे. काही वारकरी एवढाच टप्पा करून थांबतात. काही वारकरी पुणे-सासवड टप्पा (२५ कि.मी.) करून थांबतात. अशा तर्‍हेने कायम शेवटच्या टप्प्यापर्यंतचे वारकरी लाखोंच्या संख्येने असतात. संपूर्ण आळंदी ते पंढरपूरपर्यंत जाणारे २ ते ३ लाख वारकरी असतात व मध्ये-मध्ये येणारे धरून साधारणत: ५ लाखांहून अधिक जणांचा सोहळा होतो. 
दिवसेंदिवस वारी वृद्धिंगत होत असून, तीमध्ये जास्त सुशिक्षित वारकरी भाग घेत आहेत. वारीचा संदेश जातपात, लिंगभेद, वय, पंथ, धर्म हे सर्व एकाच समाजाचे घटक आहेत व सर्वसमावेशक समाज निर्माण व्हावा, ही त्याची गुरुकिल्ली आहे.
(लेखक आळंदी प्रतिष्ठानचे माजी प्रमुख विश्‍वस्त व सोहळा प्रमुख आहेत.)

Web Title: God bless him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.