प्रेरणादायी भिंतीतून जपल्या भारतरत्नांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:26 IST2019-06-24T13:25:58+5:302019-06-24T13:26:47+5:30
थोर पुरूष किंवा भारतत्नांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या, त्यांच्यापासून सदैव प्रेरणा मिळत राहावी यासाठी गोंदिया येथील तत्कालीन पोलीस अधीेक्षकांनी चक्क त्यांच्या शासकीय निवासस्थानच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रेरणादायी भिंतीतून जपल्या भारतरत्नांच्या आठवणी
नरेश रहिले
गोंदिया:
शासकीय इमारतींच्या सुरक्षा भिंतीवर विविध कलाकृती काढून त्या आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र थोर पुरूष किंवा भारतत्नांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या, त्यांच्यापासून सदैव प्रेरणा मिळत राहावी यासाठी गोंदिया येथील तत्कालीन पोलीस अधीेक्षकांनी चक्क त्यांच्या शासकीय निवासस्थानच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या भिंतीवरील भारतरत्नांचे चित्र प्रेरणादायी ठरत आहेत. या प्रेरणादायी भिंतीतून भारतरत्नांच्या आठवणी जपल्या जात आहेत.
सुरक्षा भिंतीवर निसर्गाचा देखावा काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु सुरक्षाभिंत अनेकांना प्रेरणादायी ठरावी असा मानस ठेवणे कठीणच. परंतु गोंदियाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हरीष बैजल यांनी भारतात आजपर्यंत किती भारतरत्न झालेत हे सहजरीत्या लोकांच्या ध्यानीमनी यावेत यासाठी आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर त्यांचे चित्र साकारले आहे. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील भिंतीवर ७० फूट लांब आणि ६ फूट उंच सुरक्षा भिंत चक्क भारतरत्नांची आठवण करून देणारी ठरत आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस वैभवही त्या भिंतीवर नमूद करण्यात आले. देशातील ४५ भारतरत्नांचे चित्र त्या ७० फूट लांब असलेल्या सुरक्षाभिंतीवर काढून लोकांना प्रेरणा देणारी भिंत तयार केली. गोंदियातील दोन आर्टिस्टच्या माध्यमातून या सुरक्षाभिंतीवर भारतरत्नांचे चित्र साकारण्यात आले आहे.
गोंदियाच्या पतंगा मैदानावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील भागात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी,मुख्य न्यायाधीश, पोलीस अधीक्षक व जि.प.अध्यक्ष यांची शासकीय निवासस्थाने एकाच रस्त्यावर आहेत.त्या बंगल्यांसमोर कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. त्या वसाहतीत राहणाºया कर्मचाºयांची व त्यांच्या मुलांची याच रस्त्यावरून ये-जा असते. त्या मुलांना, कर्मचाऱ्यांना या भारतरत्नांची सहज माहिती व्हावी, यासाठी ही भिंत त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. सहजरीत्या कुणालाही प्रश्न विचारला की देशात आतापर्यंत किती भारतरत्न झालेत तर पदावर असलेल्या मोठ्या-मोठ्या अधिकाऱ्यांनाही या प्रश्नाचे उत्तर सहज आठवत नाहीत. परंतु या निमित्ताने या सुरक्षाभिंतीवर तयार केलेल्या चित्रांमुळे आता गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना,कर्मचाऱ्यांना ती भिंत पाहिल्यावर सहजरीत्या भारतरत्न कोण-कोण झाले याचे स्मरण होते.
सारस वैभव आणि भारतरत्न
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर मुख्यद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा भिंतीवर भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी.व्ही.रमण, भगवान दास, एम.विश्वेवर्या, पंडीत जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभपंत, धोंडो केशव कर्वे, बिधानचंद्र रॉय, पुरूषोत्तम दास टंडन, राजेंद्र प्रसाद, डॉ.जाकीर हुसेन, पांडुरंग वामन काणे, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, वराहगिरी व्यंकटगिरी, के. कमराज, मदर टेरेसा, विनोबा भावे, खान अब्दुल गफ्फार खान, एम.जी.रामचंद्रन,डॉ. बी.आर.आंबेडकर, नेल्सन मंडेला, वल्लभभाई पटेल, राजीव गांधी, मोरारजी देसाई, अब्दुल कलाम आझाद, जे.आर.डी.टाटा, सत्यजीत रॉय, ए.पी.जे.अब्दुल कलाम, गुलजारीलाल नंदा, अरूणा असफ अली,एम.एस.शुब्बलक्ष्मी,चिदंबरम सुब्रमण्यम, जयप्रकाश नारायणन, रवी शंकर, अमर्त्य सेन, गोपीनाथ बरडोई, बिस्मिल्ला खान, भीमसेन जोशी, सी.एन.आर.राव, सचिन तेंडुलकर, अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालविय यांचे चित्र काढण्यात आले. ती भिंत आकर्षक दिसावी यासाठी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेले सारस त्या भिंतीवर विहार करताना ठिकठिकाणी दाखविण्यात आले आहे.
शिक्षकाने साकारले चित्र
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील सुरक्षा भिंतीवर ४५ भारतरत्नांना चित्रातून हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न गोंदियातील आर्टिस्ट इरफान कुरेशी यांनी केला आहे.ते पेशाने शिक्षक आहेत.गोंदियातील एका खासगी शाळेत ते चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वनविभागामार्फत दरवर्षी होणाऱ्या विदर्भ चित्रकला स्पर्धेत मागील सात वर्षापासून ते पारितोषिक पटकावित असल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांची निवड करून ते चित्र काढण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते.