सेंद्रिय सिक्कीम

By admin | Published: September 2, 2016 04:07 PM2016-09-02T16:07:52+5:302016-09-02T16:07:52+5:30

जानेवारी २०१६ मध्ये सिक्कीम हे देशातले पहिले सेंद्रिय राज्य ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा जाहीर बहुमान या राज्याला दिला. कसे दिसते पूर्णत: सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम आणि तिथली माणसे?

Organic Sikkim | सेंद्रिय सिक्कीम

सेंद्रिय सिक्कीम

Next
विनीता आपटे

मे महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी बागडोगरा विमानतळावर उतरले तेव्हा एका सिक्किमी तरु णीने हात उंचावून ती आल्याची वार्ता दिली व माझा ताबाच घेतला. तिच्या बरोबरचे तरु ण कोणाकोणावर चिडचिड करत होते पण ही तरु णी शांतपणे त्यांना समजावून, काहीतरी सांगून गाडीत बसली. अतिशय गोड हसून म्हणाली, आज खूप जास्त गर्मी आहे ना त्यामुळे माझे सहकारी रागावलेत. गंगटोकला जराही उकडत नाही त्यामुळे आम्हाला सवय नाही उकाड्याची. बोलता बोलता गाडीने वेग घेतला व आम्ही गंगटोकच्या दिशेने प्रवासाला लागलो. भारताच्या ईशान्य भागात वसलेले, एखाद्या पाचूला हिऱ्याच्या कोंदणात बसवावे असे अंगठ्याच्या आकाराचे सिक्कीम म्हणजे पर्यटकांची पंढरी. तिस्ता नदीच्या काठावरून जाणारा रस्ता आजूबाजूच्या निसर्गसौंंंदर्याने सुंदर भासत होता. तब्बल पाच तासांच्या या प्रवासामध्ये मग त्या तरुणीशी गप्पा मारताना सिक्कीमची खूपच माहिती मिळाली. निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सिक्कीमची कीर्ती आता संपूर्ण राज्य सेंद्रिय राज्य म्हणून जगभर पसरली. 
सिक्कीम राज्यात प्रामुख्याने वेलदोडे, हळद, आले, बटाटा, बॅकिव्हट, भात, भाजीपाला आणि फुलशेती ही पिके घेतली जातात. रासायनिक शेतीने पर्यावरणाला हानी पोहोचते व पर्यायाने आरोग्यही खराब होते. या सर्वावर मात करायची तर सेंद्रिय शेती हा उपाय आहे. 
परंतु जर एकटा दुकटा शेतकरी सेंद्रिय शेती करायला लागला तर आजूबाजूला रासायनिक फवारणीमुळे शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन मिळत नाही. याचा विचार करून सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री पावन चामलिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सन २००३ मध्ये संपूर्ण राज्य सेंद्रिय राज्य करण्याचा उल्लेखनीय निर्णय घेतला आणि २०१५ साली सिक्कीम हे राज्य पूर्णपणे सेंद्रिय करण्यात राज्य शासन यशस्वी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०१६ मध्ये देशातले पहिले सेंद्रिय राज्य म्हणून बहुमान दिला. 
अर्थातच संपूर्ण राज्य सेंद्रिय करण्याच्या दृष्टीने सिक्कीम राज्याला काही विशेष कायदे करावे लागले आणि त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली गेली. याचं श्रेय जितके तिथल्या शासनयंत्रणेला जाते, तितकेच तिथल्या समाजालाही जाते. 
पहाडी परिसर, सतत पावसाची रिपरिप, वेडेवाकडे अरुंद रस्ते अशा अनेक आव्हानांना तोंड देताना जेव्हा संपूर्ण राज्य सेंद्रिय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे जनजागृतीचे. नागरिकांना आधी कायदा हा तुमच्या फायद्यासाठी आहे याची जाणीव करून देणे हे मुख्य काम होते व त्यासाठीची सगळी मदत राज्य सरकारने देऊ केली .
सेंद्रिय शेती करण्यासाठी सतत प्रोत्साहनपर प्रचार आणि प्रसिद्धी करून सरकारने जनजागृती केली. सेंद्रिय मालाची विक्री करताना आवश्यक असणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारली. प्रमाणीकरणाची पद्धत अतिशय सोप्पी करून दिली. त्यामुळे अर्थातच सेंद्रिय शेतीकडे नागरिकांचा कल वाढला.
माझ्या बरोबरची ती तरु णी तिचे नाव होते पेमा. ती अगदी उत्साहाने माहिती देत होती. आपण मसाल्यासाठी जे वेलदोडे वापरतो ते इथेच पिकतात. सिक्कीममध्ये उत्पादित होणाऱ्या वेलदोड्याचे भारतातील एकूण उत्पादनापैकी ८०टक्के उत्पादन या राज्यात होते. पेमा भुतिया ही फार्मर क्लबची मेंबर. तिने अक्षरश: घराघरांत जाऊन सेंद्रिय शेतीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. प्रत्येक घरासमोरच्या जागेमध्ये भाजीपाला पिकवण्याची सुरुवात झाली. राज्य सरकार यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अत्यंत अल्पदारात बियाणे उपलब्ध करून देते. कोबी, नवलकोल, मुळे या पिकांना स्थानिक बाजारपेठेत भरघोस मागणी असते. सिम्बिडियम हे आॅर्किडच्या जातीचे फूल सिक्कीममध्ये आढळते. अत्यंत सुंदर असलेले हे फूल, यामुळे उत्पन्नाचा मोठा वाटा उचलला जातो. याकरिता राज्याचे स्वतंत्र संशोधन आणि उत्ती संविधान प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. या ठिकाणी तरु णांना प्रशिक्षण दिले जाते. लागवडीकरिता रोपे उपलब्ध करून दिली जातात. या फुलांनाही सेंद्रिय फुले म्हणून देशातून आणि परदेशातून मोठी मागणी आहे. साधारणपणे एका फुलाच्या काडीला २५० रुपये दर मिळतो. हवामानाप्रमाणे या फुलांचा हंगाम हा परदेशातील हंगाम संपल्यानंतर येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील फुलांना चांगली मागणी आहे.
पेमबरोबर गप्पा मारताना गंगटोक कधी आले ते लक्षातच आले नाही. अजून बऱ्याच भागांची आणि विशेषत: प्रत्यक्ष शेती कशी करतात ते बघण्याची उत्सुकता होतीच. तिच्या बरोबर मग खूप फिरण्याची संधी मिळाली. तिने तिथल्या बटाट्याच्या शेतात नेले तेव्हा तर तिथला बटाटा बघून तोंडात बोटे घालायची वेळ आली इतका मोठा बटाटा. अत्यंत कडक दिसणारा हा बटाटा बघितला तेव्हा वाटलं की हा उकडला जातो की नाही. पण उकडल्यानंतर त्याची चव भलतीच छान लागते. एक छोटेसे घर आणि दूरवर पसरलेले शेत हे तिथले नेहमीचेच दृश्य. बहुतेक शेतावर बायकाच काम करतात. पेमा सांगत होती की आता इथल्या बायका स्वत: शेती करतात. त्यांना बियाणे उपलब्ध करून दिली जातात तीही कर्जरूपाने. पण या बायका अथक प्रयत्न करून शेती करतात. आपला माल चांगल्या दराने विकतात. या सगळ्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य आलेले आहे.
या क्लबच्या बायका अगदी अभिमानाने सांगत होत्या.. नवरा दारू पिऊन पैसे वाया घालवतो, त्यामुळे अनेकदा मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने आम्हाला झोप लागायची नाही. पण पेमाने आम्हाला दिशा दाखवली. आता पैसे आमचे आम्हाला मिळतात. उलट नवराच पैशांची मागणी आमच्याकडे करतो तेव्हा दारूसाठी पैसे मिळणार नाहीत असे आम्ही त्याला ठणकावून सांगतो. त्या सगळ्या शेतकरणींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून मला अतिशय आनंद वाटला. 
सिक्कीम आणि सेंद्रिय शेती हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. संपूर्ण सेंद्रिय करताना कोणत्या उपाययोजना केल्या हे सांगताना पेमा अगदी अभिमानाने सांगत होती की, सिक्कीममध्ये पारंपरिक शेती सेंद्रिय पद्धतीने केली जायची. त्याच्यावरच भर देऊन आमच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आवाहन केले. पण नुसता सांगून उपयोग होत नाही. तसेच त्यासाठी खते, औषधे तयार करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार यंत्रणा उभी केली. गोमूत्र, शेण, कचरा व्यवस्थापनातून सेंद्रिय खते तयार करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे नागरिक घरातल्या घरात सेंद्रिय खते तयार करायला लागले. 
शासकीय पातळीवरच्या या अव्याहत प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली, मिळणारे उत्पादनही अत्यंत सकस मिळायला लागले. त्याशिवाय प्रमाणपत्र प्रक्रि या सोपी केली आणि मालाला बाजारपेठही उपलब्ध करून दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज सिक्कीममधली फुले व इतर उत्पादनांना चांगलीच मागणी आहे कारण इथली वस्तू शंभर टक्के सेंद्रिय आहे. 
सिक्कीमचे हे वेगळे दर्शन अत्यंत सुखावून जाते..

लेखिका पुणेस्थित टेर पॉलिसी सेण्टर 
संस्थेच्या अध्यक्ष आहेत.

aptevh@gmail.com

Web Title: Organic Sikkim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.