रिंगणनाट्य

By admin | Published: August 19, 2016 03:24 PM2016-08-19T15:24:52+5:302016-08-19T15:24:52+5:30

निषेध करणाऱ्यांच्या हाती दगडाऐवजी नाटकासारखी सृजनशील गोष्ट देणारे...निषेधासाठी सनदशीर स्वर शोधण्याच्या आगळ्या प्रयत्नांबद्दल ख्यातनाम रंगकर्मी अतुल पेठे यांच्याशी संवाद

Ringtone | रिंगणनाट्य

रिंगणनाट्य

Next
>सोनाली नवांगुळ
 
निषेध करणाऱ्यांच्या हाती दगडाऐवजी नाटकासारखी सृजनशील गोष्ट देणारे...
निषेधासाठी सनदशीर स्वर शोधण्याच्या आगळ्या प्रयत्नांबद्दल ख्यातनाम रंगकर्मी अतुल पेठे यांच्याशी संवाद
 
हे ‘रिंगण’ का?
माझ्या वडिलांच्या मृत्यूचं मला दु:ख झालं होतं नि डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनाचा तीव्र शोक झाला. गेली तीन वर्षं मी त्याच अवस्थेत आहे. या खुनानं माझ्या जगण्याचे संदर्भ बदलले. माझा डॉ. दाभोलकरांशी स्नेह होता आणि अंनिसच्या विचारांचा मी कार्यकर्ता नाही, पुरस्कर्ता आहे. पुरस्कर्ता यासाठी की शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांचा विरोध इथे केला जातो म्हणून! दाभोलकरांच्या खुनानंतर मला वाटलं, हे राजकारण, धर्मकारण भलत्या दिशेनं चाललं आहे. दाभोलकरांची पुस्तकं वाचली की लक्षात येतं की दाभोलकर वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलताहेत आणि डोळ्यांत वेगळ्या पद्धतीनं अंजन घालताहेत. एका अर्थानं संत परंपरा आणि सुधारक परंपरा ते जोडून घेताहेत, तिला पुढे नेताहेत. गाडगे महाराजांनंतर खऱ्या अर्थानं समाजसुधारक आपल्याला दाभोलकरांच्या रूपानं दिसतो जो अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी विचार करून समाजाला जाग आणणं, जाणीव निर्माण करणं हे सारं आणि तेही भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून करत होता. 
जबाबदार नागरिक आणि संवेदनशील माणूस म्हणून त्यांच्या खुनाचा निषेध केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे असं मला वाटत होतं. मग माझं हत्त्यार किंवा साधन काय? तर नाटक! या दु:खातून, व्याकूळतेतून, जखमेतून आणि शोकमग्नतेतून मला ‘रिंगणनाट्य’ ही कल्पना सुचली. हिंंदू धर्माची व्याख्या, जी विनोबांनी केली ती, ‘हिंसेनं जो दु:खी होतो तो हिंदू’ अशी. मी हिंंदू आहे! खुनी व्हा, हिंंसक व्हा, मारामाऱ्या करा असं सांगणारे कोण हिंंदू होऊन गेले किंवा आहेत? त्यांना समजावलं पाहिजे की बाबांनो तुम्ही जे अंधपणाने हिंदू धर्माला रूप देता आहात ते मला मान्य नाही. हाही माझ्या निषेधाचा भाग. माझा हा विचार अंनिसपुढे मांडून मी कार्यशाळा सुरू केल्या.
वारकरी संप्रदायामध्ये रिंगण या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. वाखरीला रिंगण धरतात. नाटकात हा शब्द आला, कारण एकमेकांच्या हातात हात घातल्याशिवाय रिंगण तयारच होत नाही. 
 
‘रिंगणनाट्य’ म्हणजे कसलं नाटक? 
यातून काय हाती आलं?
रिंगणनाट्य हे एका विशिष्ट उद्देशानं तयार झालं असलं तरी ते पथनाटक नाही. कारण पथनाट्य बऱ्याचदा रस्त्यावर जाऊन करण्याचं असतं नि मला रस्त्यात जाऊन ट्रॅफिकचा, शिस्तीचा खोळंबा करायचा नाही. पथनाट्य बहुतांशी वेळा कामगारांचे प्रश्न मांडणारं असतं. ते राजकीय, प्रचारकी नाटक असतं. हे नाटक सामाजिक आहे, प्रबोधन करणारं आहे. 
प्रचार नि प्रबोधन यात फरक आहे. प्रचार ही ताबडतोब दिली जाणारी रिअ‍ॅक्शन आहे. प्रबोधन ही वर्षानुवर्षं चालणारी एक हळुवार दीर्घकालीन प्रक्रिया आहे. माझ्या नाटकामध्ये काहीही भडक असणार नाही. मला बुद्धिप्रामाण्यवादाशी चिकटून, समाजातल्या विरोधाभासांवर, व्यंगांवर लक्ष ठेवण्याची इच्छा आहे. 
या कार्यशाळांमध्ये कार्यकर्त्यांना कलावंत करणं आणि जे कलावंत असतील त्यांना कार्यकर्ते करणं हे घडलं. अनेक कलावंतांना अमुक एक आपली सामाजिक जबाबदारी आहे हेच ठाऊक नसतं. ते आपापल्या कोशात राहत असतात. त्यांना असं वाटत असतं की, कला नावाची काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि तिचा समाजकारणाशी, राजकारणाशी, अर्थकारणाशी काही संबंध नसतो.
मला वाटतं, आपली कला हा संपूर्ण सामाजिक व्यापक पटाचा भाग आहे आणि त्या सामाजिक पटामध्ये अनेक क्षेत्रं एकमेकांशी जोडली गेली आहेत. बाहेरच्या लोकांना आयात करून त्यांच्याकडून चळवळीसाठीची गाणी व नाटकं करणं हे पटत नाही कारण त्यांची त्या विषयाशी वैचारिक बांधिलकी नसते. म्हणून मग प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनीच ही निर्मितीही करायची! त्यादृष्टीनं दोन वर्षात वीस गटांच्या चार कार्यशाळा आम्ही घेतल्या. त्यातून २० नवी गाणी व नाटकं उभी राहिली. मला हे पूर्ण कळतं आहे की नाटक ही सुरुवात आहे शेवट नव्हे! का? - तर नाटक झाल्यानंतर लोक येऊन प्रश्न विचारतात. तिथून खरा संवाद सुरू होतो. सामाजिक अभिसरणामध्ये या संवादाची सुरुवात होणं हे ‘नाटक’ आहे आणि हे नाटक म्हणजे ‘रिंगण नाटक’ आहे. 
लोकांना विचारप्रवृत्त करणं, विचारसन्मुख करणं हा कायम त्याचा एक भाग राहिलेला आहे. गाणी कशी लिहायची, घोषणा, चित्रकथा, पपेट्स, नाटकं कशी करावी, मुळात अभिव्यक्तीचे किती प्रयोग करता येतील याचा शोध घ्यायला ‘रिंगण’ मधून सुरुवात केली. 
पाचवी कार्यशाळा आम्ही भारताची राज्यघटना या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर घेतली. अंनिस हाच विषय घेऊन आता रस्त्यावर उतरतेय कारण एकदा संविधान जर कळलं तर एका अर्थानं अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मदत होईल. नाटक राजकीयदृष्ट्या योग्य व कलात्मकदृष्ट्या परिपूर्ण असलं पाहिजे. त्यातली मूल्यं तपासली पाहिजेत, ती राजकीयदृष्ट्या अचूक असली पाहिजे. आपल्या शब्दाला आपण जबाबदार व बांधील असलो पाहिजे. ‘रिंगण’च्या नाटकांना ठरीव फुटपट्टी लावली तर अनेक नाटकं चांगली झाली नसतील, पण कार्यकर्त्यांना आवाज देणं, दगडाऐवजी नाटकासारखी सृजनशील गोष्ट त्यांच्या हातात देणं ही महत्त्वाची गोष्ट. 
पुणे गटातलं ‘सापडलं रे सापडलं’ हे संविधानावरचं नाटक, शहरी अंधश्रद्धेच्या बाबतीतलं नाटक ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, इस्लामपूरच्या गटाचं ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ हे नाटक. या सगळ्या नाटकांचे शंभरसव्वाशे प्रयोग वर्षभरात या लोकांनी केले याचा अभिमान वाटायला हवा. यातून तुमचा निषेधाचा स्वर किती ताकदवान असू शकतो याची जाग येणं व दाभोलकरांच्या खुनाचा सातत्याने निर्देश करणं, त्यादृष्टीने एक दबावगट घडणं हे घडलं. 
 
‘रिंगणनाट्य’ पुस्तकाचा आशय काय? माणूस म्हणून, नाटककार म्हणून तुम्ही समाधानी आहात?
ही संकल्पना माझ्यासह राबवणारा माझा मित्र राजू इनामदार व मी मिळून हे पुस्तक लिहिलंय. ते माझ्या ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ या पुस्तकाचं एक्सटेन्शन म्हणता येईल. नाटक का केलं, कोणासाठी केलं, कसं घेतलं, कार्यशाळा कशा असतात, त्यातले विषय कसे ठरतात, नाटक कसं रचलं जातं, नाटकाकडे बघण्याचा हेतू काय, दृष्टिकोन काय? रिंगणनाट्यातली मूल्यं काय आहेत? हे सगळं त्या पुस्तकात ठासून भरलेलं आहे. सर्वसामान्य माणसांना, ज्याला ज्याला म्हणून स्वत:चा विकास करायचाय, समृद्धी साधायचीय त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. एकंदर श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञानवाद, कार्यकारणभाव, विज्ञानदृष्टी, विज्ञानसृष्टी म्हणजे काय? असे अनेक घटक माझ्या जाणिवांमध्ये भर घालायला सापडत गेले. समाज हे वस्त्र मानलं तर त्याला गुंफणारे अनेक ताणेबाणे सूक्ष्म नि स्थूल रूपात पाहता येणं नि हे वस्त्र विरू नये म्हणून चुकीच्या घटनांचा सनदशीर मार्गाने निषेध करून माणूस म्हणून उन्नत होत दुसऱ्याला हात देता येणं हे घडलं... चुकीच्या गोष्टींना सनदशीर मार्गानं नकार देतोय याचं समाधान आहेच, पण नव्यासाठी अस्वस्थता देणारं...
 
अतुल पेठे हा नाटकाच्या नवनव्या कल्पनांनी झपाटलेला, सामाजिक भानाचा पदर सतत आपल्या कलाकृतींमध्ये गुंफता ठेवलेला कलंदर नाट्यकर्मी. 
एखादी गोष्ट पटली व ठरवली की त्यासाठी स्वत:च्या नि दुसऱ्याच्या कार्यशक्तीला धार काढत सारं नेटानं पूर्णत्वाला नेणं हा त्याचा खाक्या.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसऱ्या स्मृतिदिनी २० आॅगस्ट २०१६ ला अतुल पेठेंचा एक निश्चय साधना प्रकाशनाच्या वतीने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. 
- या निश्चयाचं नाव ‘रिंगणनाट्य’.
अतुल पेठे व राजू इनामदार यांनी गेली दोन वर्षं शेकडो कार्यकर्त्यांना व कलाकारांना निषेधाच्या या आगळ्या साखळीत गुंतवत आपलं माणूस असणं राखत नेलंय. 
- या प्रयत्नांचा एक शोध..

Web Title: Ringtone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.