वीज ग्राहकांना १०.९५ कोटींचे व्याज!

By Admin | Published: May 12, 2016 03:04 AM2016-05-12T03:04:29+5:302016-05-12T03:04:29+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे वीज ग्राहकांना यावेळी नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे.

10.95 crores interest on electricity consumers! | वीज ग्राहकांना १०.९५ कोटींचे व्याज!

वीज ग्राहकांना १०.९५ कोटींचे व्याज!

googlenewsNext

महावितरण : जिल्ह्यातील ग्राहकांना ८ कोटी ३८ लाख मिळणार
नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे वीज ग्राहकांना यावेळी नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. शिवाय वीज ग्राहकांनी या बिलाचा वेळीच भरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. महावितरणकडे सुरक्षा ठेवीवर नावावर जमा झालेल्या नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १० कोटी ९५ लाख ५० हजार ५३३ रुपयांचे व्याज दिले जाणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

यापैकी नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांना ८ कोटी ३८ लाख ७९ हजार २२७ रुपये तर वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना २ कोटी ५६ लाख ७१ हजार ३२६ रुपयांचे व्याज मिळणार आहे. व्याजाची ही रक्कम लवकरच ग्राहकांच्या वीजबिलात समयोजित करण्यात येईल.
सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतल्या जाते? त्यावर व्याज मिळते का, असे अनेक प्रश्न सामान्य वीज ग्राहकाला नेहमीच भेडसावत असतात. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फे वापरल्या जाते, एवढेच नव्हे तर त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिल्या जाते. महावितरण ही ग्राहकांच्याच भरवशावर चालते, ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वीजवहन आणि वीज वितरण, देखभाल आणि दुरुस्ती तसेच प्रशासनावरील खर्च भागविल्या जातो. अशा वेळी ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरले तरच वीज खरेदी व वितरण करणे महावितरणला सहज शक्य होते.
वीजपुरवठा करतांना महावितरण ग्राहक हितास बांधील राहते. तसेच कायद्याच्या चौकटीतच कार्यरत असते. वीज कायदा २००३ च्या तरतुदीप्रमाणे महावितरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अधीन राहून तसेच आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवरच ग्राहकांना वीज पुरवठा करीत आहे. (प्रतिनिधी)

सुरक्षा ठेव म्हणजे काय!
वीज ग्राहकांना मिळणारे विजेचे बिल हे एक महिना आधी वापरलेल्या विजेपोटी दिले असते, म्हणजेच आधी वापर व त्यानंतर बिल असा हा क्रम आहे. वीज बिल आल्यानंतरच ग्राहक ते भरत असतो. म्हणजेच वीज बिल आल्यानंतर ते भरण्यासाठी साधारणत: १८ ते २१ दिवसांचा कालावधी ग्राहकाकडे असतो. म्हणजेच वितरित केलेल्या विजेचे पैसे महावितरणकडे सुमारे दीड महिन्यानंतर येतात. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वीज कायदा २००३ च्या कलम ४७ च्या उपकलम (५) व उपकलम (१) अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वितरण कंपनीकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. ग्राहकाला आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी इतके वीजबिल सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनीकडे जमा करावी लागते. याशिवाय वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निर्धारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. वीज ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही नियामक आयोगाचे निर्देश आहेत.

Web Title: 10.95 crores interest on electricity consumers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.