भाजपाच्या काळात खनिकर्म महामंडळात ४३ हजार कोटींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:19+5:302021-07-04T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात सध्या सीबीआय आणि ईडीच्या धाडीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विराेधी पक्ष भाजप यांच्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात सध्या सीबीआय आणि ईडीच्या धाडीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विराेधी पक्ष भाजप यांच्यात राजकारण रंगलेले आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने भाजपावर घोटाळा केल्याचा आरोप लावला आहे. भाजपाच्या काळात खनिकर्म महामंडळात तब्बल ४३ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला, तसेच या प्रकरणाची सीबीआय व ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली.
पवार म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिकर्म महामंडळाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. २०२० मध्ये जय जवान जय किसानच्या मंचावरून मीच हा घोटाळा उघडकीस आणला होता. नानाभाऊंनी घोटाळा उघडकीस आणला नाही. मात्र, यातील कंपन्यांना वेगळ्या पद्धतीने क्वालिफाय केले का? याबाबत त्यांनी शंका घेतली. हिंद एनर्जी आणि अरिहंत या दोन कंपन्यांना काम दिले गेले. त्यांनी १५ लाख टन कोळसा नेला. या क्वालीजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाला. भाजपाच्या काळात हे कोल ब्लॉक मिळाले होते, असा आरोप पवार यांनी केला.
दोन कोल कंपन्यांना १५ लाख टन कोळसा गेला आहे. यातील हिंद एनर्जीचा इतिहास काढला, तर ईडीही आश्चर्यचकित होईल. हे मोठे प्रकरण समोर आले, तर किती जण तुरुंगात जातील, हे कुणालाच कळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.