दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील ९८ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

By admin | Published: January 18, 2017 02:17 AM2017-01-18T02:17:41+5:302017-01-18T02:17:41+5:30

दरोडा तयारीच्या कारवाया संपूर्ण राज्यातच मोठ्या प्रमाणावर केला जात आहेत. भारतीय दंड विधानाच्या

98 percent of the convicted criminals are innocent | दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील ९८ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील ९८ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

Next

पोलीस कारवाई संशयास्पद : निरपराधही ठरत आहेत अट्टल गुन्हेगार
राहुल अवसरे  नागपूर
दरोडा तयारीच्या कारवाया संपूर्ण राज्यातच मोठ्या प्रमाणावर केला जात आहेत. भारतीय दंड विधानाच्या कलम ३९९ आणि ४०२ अन्वये या कारवाया केल्या जातात. कारवाई करण्यात आलेल्या ७५६ जणाविरुद्ध २०१५ मध्ये विविध न्यायालयांमध्ये खटला चालून केवळ १.९८ टक्के आरोपींना शिक्षा झाली तर ९८.०२ टक्के आरोपी निर्दोष सुटले.
भारतीय दंड विधानाच्या इतर कलमांच्या तुलनेत या कलमात शिक्षा होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. केवळ दरोडा तयारीच्या खटल्याच्या अत्यल्प दोषसिद्धीमुळे एकूणच गुन्ह्याच्या दोषसिद्धीचा दर खालावलेला दिसतो.
पोलिसांकडून या कलमांतर्गत होणारी कारवाई बनावट तर नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या कलमांतर्गत होणाऱ्या कारवाईने मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.राज्य सीआयडीने आपल्या संकेतस्थळावर राज्यातील २०१५ या वर्षांचा गुन्हेगारी अहवाल प्रसिद्ध केला. त्यात दरोडा तयारीच्या आरोपींचे दोषसिद्धीचे प्रमाण अत्यल्प असल्याची बाब निदर्शनास आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी वाढत असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या दोन्ही कलमांचा पोलिसांकडून वापर केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या आरोपींना एकाच ठिकाणी अटक दाखवली जाते. पाचपेक्षा अधिक आरोपी दाखवून किंवा तीनपेक्षा अधिक आरोपी दाखवून आणि दोघांना फरार असल्याचे दर्शवून त्यांच्याकडून तीक्ष्ण धारदार शस्त्र किंवा अग्निशस्त्र, मिरची पावडर, नॉयलॉन दोरी आदींची जप्ती दाखवली जाते.दरोडा तयारीच्या प्रकरणाचे खटले केवळ सत्र न्यायालयात चालतात. त्यामुळे किमान तीन महिने आरोपीला जामीन मिळणे शक्य नसते. पोलिसांना अशी कारवाई करणे सोपे असते आणि आरोपीही अधिक काळ तुरुंगात राहतो. या कारवाईत निरपराधही अडकतात, पुढे त्यांची नावे अट्टल गुन्हेगारांच्या अभिलेखात नोंदली जातात.
दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात २०१५ मध्ये १३८७ आणि २०१४ मध्ये १४३८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी अमरावती परिक्षेत्रात १४, नागपूर परिक्षेत्रात २९ गडचिरोली परिक्षेत्रात ५, नागपूर शहरात १३३, पुणे १४२, औरंगाबाद १२५, मुंबई १२१, ठाणे ६६, नाशिक ६०, नवी मुंबई ३१ आणि सोलापूर शहरात ५ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.या आकडेवारीवरून दरोडा तयारीच्या प्रत्येक प्रकरणात सरासरी पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे दिसते. सर्वात जास्त ९७० आरोपी १८-३० वयोगटातील, ३३२ आरोपी हे ३०-४५ वयोगटातील आणि ६५ आरोपी हे ४५-६० वयोगटातील आहेत. ६० वर्षांवरील केवळ दोन आरोपी आहेत.
राज्यात दरोडा तयारीचे १६ हजार ३३५ आरोपी आहेत. त्यापैकी २०१५ मध्ये १३ हजार ७५६ आरोपी हे जामिनावर होते. ७५६ आरोपींविरुद्धच्या खटल्याचे काम पूर्ण होऊन १५ आरोपी यांना शिक्षा आणि ७०५ आरोपी निर्दोष ठरले. ३६ आरोपींना दोषमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले. आश्चर्य म्हणजे २०१६ मध्ये नागपूर शहरात एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा निष्कर्ष
जसबीरसिंग ऊर्फ जवरी ऊर्फ जब्बारसिंगविरुद्ध हरियाणा या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले काही निष्कर्ष असे, या प्रकरणात फिर्यादीच तपास अधिकारी असणे ही बाब तपासावर संशय निर्माण करणारी आहे. आरोपी दरोड्याच्या योजनेबाबत आपसात संभाषण करणे ही चर्चा खुद्द कारवाई करणाऱ्या पोलिसांनी ऐकणे, ही बाबही अतिशयोक्तीपूर्ण आहे. दरोड्याच्या तयारीतील सहापैकी चार आरोपींकडे प्राणघातक शस्त्रे असणे, कोणताही प्रतिकार न करता आरोपी सहजपणे पकडल्या जाणे पोलिसांपैकी कोणालाही दुखापत न होणे, दरोडेखोरांना अटक होताना तसेच त्यांच्याकडील शस्त्रे जप्त होताना कोणत्याही साक्षीदाराने न पाहणे, ही बाबही संशय व्यक्त करणारी आहे, असेही निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.
दरोड्याच्या तयारीविरुद्ध कारवाई करताना पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर होत आहे. अनेक निरपराध तरुणांना अट्टल गुन्हेगार ठरवून त्यांचे भविष्य बर्बाद केले जात आहे. त्यामुळे ही कारवाई राजपत्रित अधिकाऱ्यांसमक्ष केली जावी, अशी अपेक्षा पीडितांतर्फे व्यक्त केली जात आहे.

Web Title: 98 percent of the convicted criminals are innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.